उद्या बाळासाहेबांची बसण्याची जागाही घेऊन जातील; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिंदे गटाला टोला

उद्धव ठाकरे हे ट्रॅपमध्ये अडकतील, एवढे नवीन आणि लहान नाही. राजकारणाचे बाळकडू त्यांना मिळाले आहेत. सर्व राजकारणाचा त्यांचा अभ्यास आहे.

उद्या बाळासाहेबांची बसण्याची जागाही घेऊन जातील; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिंदे गटाला टोला
छगन भुजबळ
| Edited By: | Updated on: Feb 21, 2023 | 1:17 PM

नाशिक : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून युक्तिवाद केला जात आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले, थोडाफार विश्वास न्यायालयावर आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर आहे. त्यांनी लवकरात लवकर हा संघर्ष संपवायला पाहिजे. रोज सुनावणी होतेय. दोन पक्ष झाले. पण आता सर्वच ते घेऊन जाताहेत, असा टोला शिंदे गटाला लावला. उद्या मातोश्री बाळासाहेब यांची बसण्याची जागाही घेऊन जातील. हे आता थांबायला पाहिजे इथंपर्यंत जाण्याची गरज नाही, असा सल्लाही त्यांनी शिंदे गटाला दिला.

लोकांनी हेच बघायचं का?

छगन भुजबळ म्हणाले, आम्ही बाहेर पडलो. काहींनी नवीन पक्ष काढले. पण, असे काही झाले नाही. अजूनही सहानुभूती उद्धव ठाकरे यांना आहे. हे या लोकांच्या का लक्षात येत नाही. सामान्य मनुष्य सांगतो शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची आहे. शिंदे गटाने थांबले पाहिजे. शाखा, कार्यालय आमचे हेच सुरू आहे. बांधला बांध असताना जशी मारामारी चालते तेच सुरू आहे. लोकांनी हेच बघायचं का?

तेव्हा ईडी कारवाई बंद झाली

उध्दव ठाकरे यांचे म्हणणं वेगळे आहे. भाजपचे म्हणणं वेगळे आहे. म्हणून भाजप शिवसेना संपवयाला निघाली आहे. काहींना ईडीची नोटीस होती. काही लोकं तिकडे गेल्यानंतर ईडी कारवाई बंद झाली. स्क्रिप्ट तयार होती. त्यानुसार केले असल्याचा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. याची कल्पना उद्धव ठाकरे यांना नव्हती असे काही नाही. त्यांना कल्पना होती, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे ट्रपमध्ये अडकणारे नाहीत

उद्धव ठाकरे हे ट्रॅपमध्ये अडकतील, एवढे नवीन आणि लहान नाही. राजकारणाचे बाळकडू त्यांना मिळाले आहेत. सर्व राजकारणाचा त्यांचा अभ्यास आहे. ट्रॅपमध्ये अडकतील असे वाटत नाही. त्यांना वाटले भाजपसोबत राहायचे नाही. शिवसेनेला इतर पक्षाच्या तुलनेत कमी मंत्रिपद भाजपने दिले. त्याचा परिणाम एका दिवसात त्यांनी भाजप सोडली, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.

राग किती दिवस ठेवायचा?

राज्यपालांच्या 12 आमदार नियुक्ती पत्राबाबत छगन भुजबळ म्हणाले, 15 दिवसांत आमदार नियुक्तीबाबत आम्हाला कळवा, असे पत्र दिले. धमकी नाही. जरी तसे असले तरी राग किती दिवस डोक्यात ठेवायचा. दोन महिने-तीन महिने सरकार पडेपर्यंत राग डोक्यात ठेवायचा का? नाव आणि निशाणी दिली आहे. त्यानुसार नियुक्ती करतील. जनतेच्या कोर्टात फैसला होईल. एक पुढे जाईल एक मागे थांबेल, असंही छगन भुजबळ यांनी म्हंटलं.

Follow Us