पर्यटनस्थळावर जाऊ नका, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

| Updated on: Jul 20, 2023 | 11:19 AM

सध्या पावसाचा पॅटर्न बदलला आहे. पूर्वी एका महिन्यात एवढा पाऊस पडायचा. आता एक ते दोन दिवसात पाऊस पडतोय. त्यामुळे आव्हान वाढलं आहे. अशा प्रकारचे धोकादायक स्पॉट शोधून कार्यवाही करण्यात येणार आहे.

पर्यटनस्थळावर जाऊ नका, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

खालापूर | 20 जुलै 2023  : खालापूर येथील इर्शाळगडाजवळील इर्शाळवाडीत दरड कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही ढिगाऱ्याखाली 171 जण अडकले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसापासून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हा हाहा:कार उडाला आहे. राज्यभरात पावसाने कहर केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

खालापूर येथील दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं. जे वाचले त्यांना धीर दिला आणि जखमींची विचारपूस केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

घराबाहेर पडू नका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं. तसेच टुरिस्ट साईटवर जाऊ नका, असं आवाहनही केलं आहे. शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. परिस्थिती पाहून ते निर्णय घेतील, अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेल्पलाईन नंबर

810819555

पावसाचा पॅटर्न बदलला

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या पावसाचा पॅटर्न बदलला आहे. पूर्वी एका महिन्यात एवढा पाऊस पडायचा. आता एक ते दोन दिवसात पाऊस पडतोय. त्यामुळे आव्हान वाढलं आहे. अशा प्रकारचे धोकादायक स्पॉट शोधून कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून घटनेची माहिती घेतली आणि मदतीचं आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

आदिती तटकरे रुग्णालयात

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. आज सकाळीच त्या रुग्णालयात गेल्या. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली.

यावेळी एमजीएम चे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी नायब तहसीलदार पनवेल लाचके उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. इथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत. या दुर्घटनाग्रस्त घटनास्थळी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी दानवे यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.