मनसेला नवी मुंबईत मोठं खिंडार, दीड महिना वाट पाहिली, काहीच घडलं नाही; अखेर घोरपडे शिंदे गटात

| Updated on: Apr 14, 2023 | 6:29 AM

दीड महिन्यापूर्वी मनसेतील पदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर प्रसाद घोरपडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून घोरपडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

मनसेला नवी मुंबईत मोठं खिंडार, दीड महिना वाट पाहिली, काहीच घडलं नाही; अखेर घोरपडे शिंदे गटात
prasad ghorpade
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईत मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेचे उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी दीड महिन्यांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. पण दीड महिन्यात काही घडलं नाही. घोरपडे यांची भेट घेण्यासाठी मनसेचा कोणताही नेता गेला नाही. त्यांची समजूतही काढली नाही. घोरपडे यांनी जे आरोप केले होते त्याचीही दखल घेतली गेली नाही. नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांना समजही देण्यात आली नाही. त्यामुळे घोरपडे नाराज होते. अखेर या नाराजीतूनच प्रसाद घोरपडे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. घोरपडे यांनी अखेर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करून नव्या राजकीय इनिंगची सुरुवात केली आहे.

नवी मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबईतील मनसेची गळती सुरूच आहे. नवी मुंबई मनसेचे उप शहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. घोरपडे यांनी नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजनान काळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गजनान काळे हे धमकी देत असल्याचा आरोप घोरपडे यांनी केला होता. हा आरोप करत त्यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिली होती. पण त्यांनी पक्ष सोडला नव्हता. पदांचा राजीनामा दिला असला तरी आपण पक्षातच राहून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

कलहाची दखल नाही

राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून पक्षातील अंतर्गत कलहाची दखल घेतली जाईल आणि त्यावर तोडगा काढला जाईल अशी घोरपडे यांची अपेक्षा होती. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी पक्षश्रेष्ठींना विनंतीही केली होती. पण जवळपास दीड महिन्यात काहीच झाले नाही. त्यामुळे त्यांनी अखेर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेगटाकडून घोरपडे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

काय म्हटलं होतं राजीनाम्यात?

घोरपडे यांनी 10 मार्च 2023 रोजी पदाचा राजीनामा दिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पत्र दिलं होतं. हे पत्र त्यांनी फेसबुकवर शेअर केलं होतं. तसेच एक पोस्टही केली होती. पक्षातील माझ्या सर्व सहकारी मित्र, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची प्रथम माफी मागतो कळवू इच्छितो की पक्षातील अंतर्गत बाबी याचा गेले काही महिने मी सामना करत होतो, ज्याला कंटाळून मी काल माझ्या नवी मुंबई उपशहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. बाकी समाजासाठी माझे काम हे नेहमी चालूच राहील. तूर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र!, अशी पोस्ट त्यांनी केली होती.

राजीनामा पत्र जसेच्या तसे

मा. राज साहेब ठाकरे.

दिनांक : 10/03/2023

विषय – पक्षाच्या नवी मुंबई, उपशहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देणे बाबत.

2017 साली माझा नवी मुंबई मनसे मध्ये पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर मी मागे न पाहता कोपरखैरणे घणसोली विभागात घराघरात तुमचे विचार पोहचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. सामान्य जनतेच्या न्यायासाठी आंदोलने करून केसेस देखील घेतल्या, निवेदन घेऊन सरकारी दफतरी जाणे, हिंदू सण पक्षाकडून मोठ्‌या उत्साहाने साजरे करणे, वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, नवी मुंबईमधील सर्वात जास्त पक्ष प्रवेश घेणे, विधानसभा निवडणुकीत सहकारी उमेदवाराच्या प्रचारात त्याच्या खांद्याला खांदा लावून ऐरोली विधानसभा पिंजून देखील काढली होती. मी केलेले एक ना एक काम आपल्याला माझ्या सोशल मीडियावर दिसेलच, तेवढेच काय तर गुगलवर देखील दिसेल ही माझी पात्रता आहे.

साहेब, मी आता पक्षाच्या उपशहर अध्यक्ष पदावर कार्यरत आहे, काम करताना मला शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून बऱ्याच वेळा अडचणीचा सामना करावा लागला. काही गोष्टी अश्या आहेत ज्या मी या पत्रामध्ये ही नमूद नाही करू शकत, सदर बाबी आपण सांगिल्या प्रमाणे पक्षाच्या नेत्यांनाही वेळोवेळी सांगितल्या. पण मला वाटतं त्यांचाही त्याला ना इलाज असेल म्हणून त्यांनीही त्या सर्व प्रकरणात दुर्लक्ष केले, असो, बोलण्या सारखे खूप आहे साहेब, पण त्यासाठीही आपल्यापर्यंत मला येऊ देखील दिले जात नव्हते.

मी आपल्या प्रेमापोटी जनतेची सेवा करत राजकारणात समाजकार्य करत इथ पर्यंत आलो. परंतु आता मला पक्षांतर्गत कुरघोडीमुळे काम करणे शक्य होत नाही. मी जबाबदारीच्या पदावर असून देखील त्या पदाला किंमत दिली जात नाही. पदावर राहून मी त्या पदाला न्याय देऊ शकत नसेल तर माझा उपयोग नाही असे मला वाटते. याच मुळे मी माझ्या पदाचा राजीनामा आपल्याकडे देत आहे. तरी आपण त्याचा स्वीकार करावा ही आपल्याला नम्रपणे विनंती.

जबाबदारीच्या पदावर आलो तेव्हा वाटले मोठी जबाबदारी आली. आता राजकारणात तुमच्या मार्फत जनतेसाठी खूप काही करणार हे मनात पक्के केले होते. पण आता ते एका स्वप्नाप्रमाणे राहूनच गेले साहेब याची उणीव नेहमी माझ्या मनात असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र

आपला नम्र,

प्रसाद घोरपडे