नवी मुंबईत झोपडपट्टी परिसरांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, उच्चभ्रू वस्त्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतीच

नवी मुंबई शहरात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात असून कोरोनामुक्ती कधी असा सवाल सात्यत्याने विचारला जात होता. शिवाय, देशात आणि राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका जोरदार प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शहरातील सुशिक्षित मानल्या जाणाऱ्या उपनगरांमध्ये रुग्णसंख्या अधिक असून शहरातील झोपडपट्टी परिसर सरस ठरला आहे.

नवी मुंबईत झोपडपट्टी परिसरांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, उच्चभ्रू वस्त्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतीच
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 3:23 PM

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात असून कोरोनामुक्ती कधी असा सवाल सात्यत्याने विचारला जात होता. शिवाय, देशात आणि राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका जोरदार प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शहरातील सुशिक्षित मानल्या जाणाऱ्या उपनगरांमध्ये रुग्णसंख्या अधिक असून शहरातील झोपडपट्टी परिसर सरस ठरला आहे. तुर्भे, दिघा आणि चिंचपाडा असा झोपडपट्टी परिसर कोरोनामुक्त होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

दोन दिवसांपूर्वी अचानक 80 वर गेलेल्या रुग्णसंख्येत बेलापूर सारख्या उपनगरात सर्वात जास्त रुग्ण आढळून आले होते. तर काल आढळून आलेल्या 40 रुग्णांमध्ये तुर्भे आणि दिघा या दोन्ही झोपडपट्टी परिसरात शून्य रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरात रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची त्वरित तपासणी करण्यात येत असल्याने कोरोना प्रसार रोखण्यासाठी मदत होत असल्याचे आरोग्य अधिकारी सांगत आहेत.

शिवाय या भागांमध्ये महानगरपालिकेच्या सर्व उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले जात असून, लसीकरणालाही गती देण्यात आली आहे. प्रत्येक घरामधील कोणाचे लसीकरण झाले आणि कोणाचे झालेले नाही याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांच्याकडे पाठपुरावा करुन लसीकरण करुन घेतले जात आहे. शिवाय, रुग्णसंख्या कमी झाली असली तरी येथे लोकांकडून नियमांचे पालन करण्यात निष्काळजीपणा होणार नाही, याकडेही लक्ष दिले जात आहे. या ठिकाणी स्थानिक नागरिकांसह सर्वच घटकांनी मिळून कोरोनामुक्त परिसर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

ऐरोलीतही सुपर स्पेशालिटी उपचार, चिंचपाड्यात लहान मुलांसाठी आयसीयू वॉर्ड

ऐरोली येथील चिंचपाडा झोपडपट्टीत उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे कोव्हिड सेंटरची क्षमता एकूण 100 बेडची असून त्यापैकी 17 बेडवर आयसीयू आणि व्हेंटिलेटरचे असणार आहेत. तसेच, अन्य सर्वच बेडवर ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी विशेष आयसीयू वॉर्डही या रुग्णालयात तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे ऐरोली आणि दिघा परिसरातील झोपडपट्टीवासीयांना आता सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या धरतीवर वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.

संबंधित बातम्या :

नवी मुंबई शहरात लसींचा तुटवडा; तिसऱ्या लाटेचे संकट कायम, महापालिका हतबल

CIDCO | कोव्हिड योद्ध्यांसाठी सिडकोची घरे कमी आणि नोंदणी जास्त