नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येबाबत दिलासा; मात्र एपीएमसी मार्केटमुळे प्रशासनाची धाकधूक वाढली

| Updated on: Aug 10, 2021 | 1:19 PM

नवी मुंबई महापालिका परिसरात गेल्या अनेक दिवसापासून रुग्णसंख्या सरासरी 50 च्या जवळ आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनासह नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत. मात्र, शहरातील मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा कोरोना नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येबाबत दिलासा; मात्र एपीएमसी मार्केटमुळे प्रशासनाची धाकधूक वाढली
APMC Market Crowd
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिसरात गेल्या अनेक दिवसापासून रुग्णसंख्या सरासरी 50 च्या जवळ आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनासह नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत. मात्र, शहरातील मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा कोरोना नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. शहरातील सर्वच उपनगरातील लोक संख्येच्या मानाने रुग्णसंख्या फारच नगण्य आहे. तर अनेक उपनगरांमध्ये 0 ते 3 अशी रुग्णसंख्या असल्याने परिस्थिती पालिकेच्या अजिबात हात बाहेर नाही.

मात्र, एपीएमसी मार्केटमधील किरकोळ व्यापाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. सर्वच बाजार घटक नियमांची पायमल्ली करत आहेत. बाजारातील 80 टक्के लोक गुटखा, मावा अशी व्यसने करत असल्याने बाजार आवारात थुंकण्याचेही प्रमाण अधिक असल्याने त्यातुन कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती प्रशासन व्यक्त करत आहेत. तर बाजार समितीच्या प्रशासनासह अनेक बाजार घटकांचे बळी जाऊन सुद्धा बाजार समिती प्रशासन गंभीर नसल्याने बाजार आवारात अशा प्रकारे नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे.

शहरातील झोपडपट्टी भागाची शून्य रुग्णसंख्येकडे वाटचाल

शहरातील झोपडपट्टी भागही आता शून्य रुग्णसंख्येकडे वाटचाल करत असून दिघा आणि तुर्भे मध्येही रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास तिसऱ्या लाटेला थोपवण्यास महापालिकेला नक्क्कीच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर पालिकेच्या उपाययोजना आणि नियोजनाच्या मानाने केवळ काहीअंशी रुग्ण शहरात उपचार घेत आहेत. तर काही रुग्ण विलगीकरण कक्षात असून मृत्य संख्या खुपच कमी आहे.

नवी मुंबईत अद्याप 5 लाख 82 हजार 652 व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत. तर 8 लाख 2 हजार 665 व्यक्तींच्या अँटिजेन तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे एकूण 14 लाख 85 हजार 317 जणांची करोना चाचणी केली गेली आहे.

तरी सुद्धा महापालिकेने नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तपासण्या करण्यावर भर दिला आहे. तर रुग्णांना त्वरित उपचार मिळणे अधिक त्या रुग्णापासून कोरोना प्रसार थांबवणे हे पालिकेचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्वच ठिकाणी आलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मात्र, मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कोरोना चाचण्या होत नसल्याचे दिसत आहे. तर नवी मुंबईत रुग्ण संख्या कमी झाली असली तरी मार्केटमध्ये सभोवतालच्या शहरांमधून मोठ्या प्रमाणावर ग्राहक तर राज्यासह परराज्यातून सुद्धा शेतमाल येत असल्याने कोरोना प्रसार होण्यासाठी एपीएमसी मार्केट घातक असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

पालिकेच्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या तपासण्यांमुळे संशयित करोनारुग्ण किंवा लक्षणे नसणारा रुग्णही उपचाराच्या कक्षेत येत आहे आणि त्याच्यापासून होणारा करोना प्रसार, संसर्ग थांबत आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, असे असले तरी करोनाची भीती कायम असून एपीएमसी मार्केटमधून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे करोना नियमांचे पालन करा, मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित वावराचा नियम पाळा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात गर्दी; इतर भाज्यांचे दर स्थिर, पालेभाज्या मात्र महागल्या

श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये “कही खुशी कही गम”