उद्धव ठाकरे यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मोदी सरकारचा शेवटचा…

| Updated on: Feb 01, 2024 | 1:13 PM

बिल्किस बानोकडे जा. ताई तूही महिला आहे. तुझ्यासाठी काम करणार आहे, असं त्यांना सांगा. शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं. थंडी, वारा, ऊन, पाऊस याची पर्वा केली नाही. शेतकऱ्यांना तुम्ही अतिरेकी समजत होता. आता अतिरेक्यांना शेतकरी समजायला लागला. त्यांच्यासाठी काम करायला लागला. हा सर्व भुलभुलय्या आहे. हे थोतांड आहे. पूर्वी जादूचे प्रयोग होत होते. आताही होत असतील. पाहिले नसेल तर सांगा. आता दिल्लीत सुरू आहेत जादूचे प्रयोग, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मोदी सरकारचा शेवटचा...
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, रायगड | 1 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ संकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाची तुलना जादूच्या प्रयोगाशी केली आहे. जादूमध्ये कबूतर उडून जातं. हाती काही उरत नाही, तसा हा अर्थसंकल्प आहे. निवडणुका झाल्यावर हाती काही उरणार नाही, असं सांगतानाच आम्हाला या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याची टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अर्थसंकल्पावरून त्यांनी जोरदार टीका केली. जादूगार यायचा रिकामी टोपी दाखवायचा. मंत्र म्हणायचा. झोळीत हात घालायचा आणि कबुतर काढायचा. तेव्हा आश्चर्य वाटायचं. रिकाम्या टोपीतून कबुतर काढलं आपलं मत यालाच, असं आपण म्हणायचो. पण लक्षात आलं नाही की, कबुतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली. हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. आता महिलांना फुकटात गॅस सिलिंडर देतील. निवडणुका झाल्यावर दुपटीने तिपटीने गॅसचे दर वाढतील. आम्हाला तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाहीये, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

शेवटचा अर्थसंकल्प

निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, सुट्टी नाही. गेल्या 15 दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात गेलो होतो. तुम्ही मातोश्रीवर येत आहात. मी विचार केला. आपण जाऊन तुम्हाला भेटू. शाखा भेटी ठरवल्या आणि अशा सभाच झाल्या. सर्व विधानसभा मतदारसंघात जाऊन जनतेला भेटणार आहे. त्याची सुरुवात रायगड जिल्हा पेणपासून झाली आहे. आज आपण बोलत आहोत. संवाद साधत आहोत. त्याचवेळी देशातला मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. काय बोललो मी… शेवटचा अर्थसंकल्प. निर्मला सीतारामन यांनी जड अंतकरणाने हे कार्य पार पाडलं. शेवटचा का होईना त्यांनी अर्थसंकल्प मांडला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

धाडस केलं, अभिनंदन

सीतारामन यांना आणखी एका गोष्टीबद्दल धन्यवाद देतो. मी अर्थ संकल्प वाचला नाही. ऑनलाइन ज्या हायलाईट येतात त्या वाचल्या. त्यांनी सांगितलं चार जातींसाठी काम करणार. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी मोठं धाडस केलं आहे. पंतप्रधानांसमोर बोलण्याचं धाडस दाखवलं त्यामुळे मी अभिनंदन करतो, असा चिमटाही त्यांनी काढला.

अदानी म्हणजे देश नाही

निवडणुका आल्यावर का होईना सुटाबुटातील मित्र म्हणजे देश नाही. तरुण, शेतकरी आणि महिला म्हणजे हा देश हे त्यांना कळलं हे नशीब. दहा वर्ष झाली. दहा वर्षात या जाती तुम्हाला कळल्या. तुमच्यासोबतचे अदानी म्हणजे देश नाही. त्यांच्यासाठी दहा वर्ष खर्च घातली तो म्हणजे देश नाही. तुम्ही महिलांकडे लक्ष देत आहात. तर मणिपूरमध्ये का जात नाही? मणिपूरमध्ये जा आणि तिथल्या महिलांना सांगा देशात महिला आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं. आता आम्हाला कळलं. निवडणुकांमध्ये महिलांची मते पाहिजे. म्हणून सांगतो महिलांसाठी कामे करणार, असा हल्लाच त्यांनी चढवला.