एकाच झटक्यात तब्बल 90 राजीनामे, राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का; राजकारणात खळबळ!
आता नाराजीनाट्य सुरू झाले आहे. या नाराजीनाट्याचा पहिला धक्का राष्ट्रवादी पक्षाला बसला आहे. तब्बल 90 सामूहिक राजीनामे आल्याने या पक्षाला जबर धक्का बसला आहे.

बुलढाणा : विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळावे म्हणून बरेच नेते आपापल्या पक्षातील नेतृत्त्वाची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अनेक बड्या नेत्यांना डावलून काही नशीबवान नेत्यांनाच या निवडणुकीचे तिकीट मिळाले. त्यामुळे आता नाराजीनाट्य सुरू झाले आहे. या नाराजीनाट्याचा पहिला धक्का राष्ट्रवादी पक्षाला बसला आहे. तब्बल 90 सामूहिक राजीनामे आल्याने या पक्षाला जबर धक्का बसला आहे.
नेमका कोणी राजीनामा दिला?
मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील प्रमुख 90 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या सर्व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे आपले राजीनामे सोपवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड नाझेर काझी यांना विधानपरिषद उमेदवारी न मिळाल्याने या पदाधिराऱ्यांनी आपल्या सदस्यात्वाचे राजीनामे दिले आहेत. काझी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत.
90 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
गेल्या अनेक वर्षांपासून विधानपरिषदेवर जाण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु यावेळीही त्यांना संधी देण्यात आली नाही. म्हणूनच आपली नाराजी व्यक्त करत 90 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. आज बुलढाण्याती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार होती. परंतु या सामूहिक राजीनाम्यांमुळे ही बैठक रद्द करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे. नाराजी असल्याने पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यासमोरच घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
कोणत्या पक्षाने कोणाला तिकीट दिले?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा आली होती. या जागेसाठी राष्ट्रवादीन मुंबईतील नेते झिशान सिद्दीकी यांना तिकीट दिले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिंदे यांच्या पक्षाकडून नीलम गोऱ्हे, बच्चू कडू यांना तिकीट देण्यात आले आहे. तर दुसरीकडे भाजपाने सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार या पाच नेत्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. कोणत्याही पक्षाने अतिरिक्त उमेदवार न दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
