महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चर्चा, ‘त्या’ प्रश्नावर अखेर अजित पवारांनी मौन सोडलं

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या विजयानंतरच्या राजकीय समीकरणांवर त्यांनी भाष्य केले आहे. शरद पवार गटातील आमदारांच्या पक्षप्रवेशाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे आणि राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरही ते बोलले आहेत.

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चर्चा, त्या प्रश्नावर अखेर अजित पवारांनी मौन सोडलं
अजित पवार आणि शरद पवार
Chetan Patil | Updated on: Nov 27, 2024 | 7:18 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक पसंती दिली. महायुतीचा तब्बल 230 जागांवर ऐतिहासिक विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागांवर यश आलं. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा सुरु होती. अजित पवार यांची शरद पवार गटाच्या आमदारांसोबत गुप्त बैठक झाल्याचीदेखील चर्चा आहे. या चर्चांवर अखेर अजित पवार यांनी आज मौन सोडलं आहे.

शरद पवार गटाचे आमदार तुमच्या पक्षात येणार असल्याची चर्चा आहे, याबाबत काय सांगाल? असा प्रश्न अजित पवारांना आज पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “निकाल लागून अजून तीन दिवस झाले. अजून कशातच काही नाही. मात्र काहीपण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या संपर्कात कोणीही नाही. मी निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतली. त्यात आमच्या पराभूत आमदारांचा देखील समावेश होता. त्यांचे मन जाणून घेतलं. निवडून आलेल्या आमदारांना सूचना केल्या. त्यांना मतदारसंघात जाऊन जनतेच्या आभार मानायचं सांगितलं”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

यावेळी अजित पवार यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. “दोघे एकत्र येणार अशी चर्चा अनेक वेळा झाली आहे. जेव्हा काही विषय नसतात तेव्हा हे विषय सोडले जातात. आम्ही एकत्र येण्याचा प्रश्न नाही. आम्ही महायुतीत आहोत. महायुतीत राहून राज्याचं हित कसं सांभाळता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहील”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

यावेळी आमदार रोहित पवार यांच्या अजित पवार यांना आत्ताच मुख्यमंत्री करा, या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं. “बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही. आम्ही आणि आमचा पक्ष, आमदार, कार्यकर्ते थांबलेले आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us