मी मोदींना प्रश्न विचारला असता, पण त्यांची… शरद पवार यांनी काढला चिमटा; नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा सुरू आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यासाठी महत्त्वाच्या जागांवर मतदान होणार आहे, त्यामुळे मोदी राज्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदीच नव्हे तर अमित शाह आणि अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे. तसेच विविध विषयांवर भाष्यही केलं आहे.

मी मोदींना प्रश्न विचारला असता, पण त्यांची... शरद पवार यांनी काढला चिमटा; नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Apr 20, 2024 | 12:46 PM

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राम मंदिराच्या मूर्तीवरून टीका केली आहे. अयोध्येतील राम मंदिरात रामासोबत सीतामाई का नाही? असा सवाल शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर पवार यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. त्यावर पवार यांनी आज पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. मला एका सभेत प्रश्न विचारण्यात आला, रामाची मूर्ती बसवली पण सीतेची का नाही? मी मोदींना प्रश्न विचारला असता पण त्यांची व्यक्तिगत अडचण आहे, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा चिमटा काढलाय. भाजपच्या 400 पारच्या घोषणेवरही त्यांनी टीका केली. मला भाजपचा हा नारा चुकीचा वाटतो. लोकसभेची संख्या 543 सांगितली तर मी खरी मानणार, असं शरद पवार म्हणाले. दहा वर्षात शरद पवार यांनी काय केलं? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. त्यालाही पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. मी 10 वर्ष सत्तेत नव्हतो. सत्तेत ते होते. 10 वर्षात त्यांनी काय केलं हे सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे. माझ्याकडे शेती खातं होतं तेव्हा मी काय केलं हे जगाला माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आमचा भर विधानसभेवर

मागच्या निवडणुकीत विरोधकांना सहा जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत 50% जागा महाविकासला आघाडीला मिळणार आहेत. महाविकास आघाडीत जागांबाबत एक वाक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या कमी जागा घेतल्या. कारण आमचं लक्ष विधानसभा निवडणुकीवर आहे. विधानसभेत अधिक जागा मिळवणं आणि अधिक सहकारी लोकसभेत पाठवणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं सांगतानाच सध्या महाविकास आघाडीसाठीचं वातावरण अनुकूल आहे, असं पवार म्हणाले.

किंमत मोजावी लागत आहे

धनगर आरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं. धनगर समाजाला सवलती मिळण्याचा अधिकार आहे, हे आम्ही सातत्याने सांगत होतो. पहिल्या बैठकीत आरक्षण देऊ असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन दिला होता. त्याचं काय झालं? आज 8 वर्ष झाली. ते सत्तेत आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण दिले होते. अजूनही दिलं नाही. धनगर समाजाला मुंबई आणि दिल्लीत न्याय मिळत नाही. राज्य सरकारने चुकीची बाजू मांडली. त्याची किंमत गरीब धनगर समाजाला मोजावी लागत आहे, असं ते म्हणाले.

त्या निर्णयाला संमती नव्हती

शरद पवार हे भाजपसोबत जाण्यास अनुकूल होते, असं अजित पवार यांच्याकडून वारंवार सांगितलं जात आहे. अजितदादांच्या या दाव्यावरही त्यांनी भाष्य केलं. भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला आमची संमती नव्हती, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us