आमदार निलेश लंकेंच्या बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी भेटीगाठी, बड्या मंत्र्याला भेटले

| Updated on: Aug 12, 2021 | 9:33 AM

बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केली आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री सुनील केदार यांना भेटून आमदार लंके यांनी यासंदर्भातील निवेदन दिलं.

आमदार निलेश लंकेंच्या बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी भेटीगाठी, बड्या मंत्र्याला भेटले
सुनील केदार आणि निलेश लंके
Follow us on

अहमदनगर : बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केली आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री सुनील केदार यांना भेटून आमदार लंके यांनी यासंदर्भातील निवेदन दिलं. राज्य सरकारने पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टाचे वकील आणि संघटनांची बैठक लावून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली.

बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय आहे. बैलगाडा शर्यती संदर्भात राज्य शासनाने केलेल्या कायदा, विरोधातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी तात्काळ घेण्यात येऊन शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी, यासाठी पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे यासंदर्भात निवेदनाद्वारे लंके यांनी मागणी केली.

सुप्रीम कोर्टाचे वकील आणि संघटनांची बैठक लावा

पाचशे वर्षांपासून बैलगाडा शर्यत सुरु आहे मात्र 2017 पासून बंदी आली. या निर्णयाविरोधात अनेक संघटना आंदोलन करत आहेत. बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी अनेक संघटना प्रयत्नशील आहेत. तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यामध्ये बैलगाडा शर्यत सुरु झालीय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टाचे वकील आणि संघटनांची बैठक लावून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी लंके यांनी केली आहे.

जी सुनावणी प्रलंबित आहे, ती तात्काळ घेण्यात येऊन शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी. लवकरात लवकर बैलगाडा शर्यत सुरू झाली पाहिजे. यासाठी आमचा सर्वांचा लढा सुरु आहे, असं निलेश लंके यांनी यावेळी सांगितलं.

बैलगाडा शर्यतीसाठी नगरमध्ये आंदोलन

बैलगाडा शर्यत सुरु करा अशी मागणी करत राहुरी‌ येथे नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ‘पेटा हटवा , बैल वाचवा’ असा नारा यावेळी आंदोलकांनी दिला. घोडा, बैलांसह शेतकरी रास्ता रोको आंदोलनात मोठ्या‌ संख्येने सामील झाले होते. अहमदनगर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी राहुरी बाजार समितीसमोर एक तास रास्तारोको करत महामार्ग अडवून धरला. या रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

पुण्याच्या मावळमध्ये आंदोलन

महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी चालू व्हावी, यासाठी वडगाव मावळ येथे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी. बैलगाडी शर्यत हा ग्रामीण भागातील एकेकाळी महत्वाचा खेळ मानला जात होता. या खेळाशी ग्रामीण भागातील लाखो शेतकरी-तरुणांचे भावनिक नाते आहे. ग्रामीण भागात यात्रोत्सवात भरविण्यात येणार्‍या बैलगाडी शर्यतींच्या निमित्ताने होणारी अर्थिक उलाढाल ही मोठी आहे.

इचलकरंजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

बैलगाडा शर्यत सुरु करा अशी मागणी करत बैलगाडी संघटनेच्या चालक मालकांनी इचलकरंजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. पोलिसांनी मध्येच मोर्चा अडवल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. काही काळ मोर्चामध्ये तणावाचे वातावरण होतं. मोर्चेकरी संघटनांनी आपल्या मागण्याचं निवेदन इचलकरंजी तहसीलदारांना दिलं.

हे ही वाचा :

Video | “बैलगाडा शर्यत सुरू करा”, नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको