Kangana Ranaut: ते आता का पळ काढतायत..; कंगना राणौत यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून खासदार कंगना राणौत यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते देशाचा विश्वासघात करत आहेत, अशी टीका कंगना यांनी केली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या, ते जाणून घ्या..

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 17 वा दिवस आहे. संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी एनडीएच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात निदर्शनं केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अशातच भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी राहुल गांधीवर जोरदार टीका केली आहे. “कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासंदर्भात संसदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी चर्चा करण्याची इच्छा व्यक्ती केली होती. पण जेव्हा सरकारने चर्चेला होकार दिला, तेव्हा ते मागे हटले. यावरून तुम्ही पाहू शकता की ते देशाशी किती गद्दारी करत आहेत. त्यांनी संसदेचं कामकाज एका दिवसासाठीही चालू दिलेलं नाही. ते देशाचा विश्वासघात कशाप्रकारे करत आहेत, ते सर्वजण पाहत आहेत”, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील राजकीय लढाई आता संसदेत तीव्र होताना दिसत आहे. अनुराग ठाकूर यांनीसुद्धा काँग्रेस आणि राहुल गांधी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजप खासदार बासुरी स्वराज आणि रवी शंकर प्रसाद यांनीसुद्धा झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जप्रकरणी राहुल गांधींकडून जबाबदारीची मागणी केली आहे. “राहुल गांधी, झारखंडमध्ये झालेल्या अन्यायाचं उत्तर द्या”, अशी घोषणाबाजी भाजपच्या खासदारांनी केली. संसदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
भाजप खासदारांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही प्रश्न विचारला आहे की, त्यांनी अद्याप झारखंडला का भेट दिली नाही? झारखंडच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्या गप्प का आहेत, असा सवाल करण्यात आला आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर देशभरातील विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. रांचीमध्ये जेपीएससी (JPSC) आणि जेएसएसी (JSSC) भरती परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात विद्यार्थी 25 जुलैपासून आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांनी सोमवारी झारखंडच्या विधानसभेभोवती उभारलेले अडथळे तोडून विधानसभेच्या आवारात प्रवेश केला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठिचार्ज केला आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फेकल्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर पाण्याचाही मारा करण्यात आला.
