सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान, 6 दिवसानंतरही नोटीशीला उत्तर नाही; राष्ट्रवादीतच मतभेद?

NCP Political news : सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आल्याच पाहायला मिळत आहे. त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीला 6 दिवसानंतरही अद्याप उत्तर देण्यात आलेलं नाही.

सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान, 6 दिवसानंतरही नोटीशीला उत्तर नाही; राष्ट्रवादीतच मतभेद?
| Updated on: Jul 19, 2026 | 9:52 AM

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांआधी त्यांना पक्षातून आव्हान मिळालं होतं. सच्चिदानंद सिंह यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवून अध्यक्षपदाला आव्हान दिलं होतं. आता या नोटिशीला 6 दिवस उलटल्यानंतरही अद्याप सच्चिदानंद सिंह यांना पक्षाकडून उत्तर देण्यात आलेलं नाही. ही नोटीस सुनेत्रा पवार,प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवण्यात आली होती. आता नोटीसला उत्तर देण्यावर पक्षातील मतभेद समोर आले आहेत.

अध्यक्षपदाला आव्हान देणार्‍या सच्चिदानंद यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही. सच्चिदानंद सिंह यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्यामागे पक्षातील नेत्यांचा हात आहे का, यासंदर्भातील पडताळणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. सच्चिदानंद यांनी पाठवलेल्या नोटीसमुळे पक्षात एकच खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीवरच आक्षेप घेतलाय. त्यांनी थेट एका वकिलामार्फत अध्यक्षांना नोटीस धाडली. त्यांनी अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासहित प्रफुल्ल पटेल, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनाही नोटीस पाठवली. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड रद्द करावी. त्यानंतर नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे.

सच्चिदानंद सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक अवैध असल्याचा दावा केलाय. 26 फेब्रुवारी रोजी झालेली निवड अवैध झाल्याचा त्यांचा दावा आहे. आता त्यांच्या नोटीसनंतर सुनेत्रा पवार यांची निवड करताना कोणत्या कायदेशीर त्रुटी राहिल्या आहेत का, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सच्चिदानंद यांच्या मागून आणखी कोणाला काय सिद्ध करायचं आहे, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहे. आता सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस देऊन ६ दिवस उलटले आहेत. मात्र त्यानंतरही कोणत्याही उत्तर देण्यात आलेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्व आलबेल आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Follow Us