देशात हुकूमशाही सुरू झालीय, भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
sanjay raut : संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सरकारला भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात, असं म्हणत राऊतांनी टीका केली.

दिल्लीतील सोनम वांगचुक यांचे उपोषण दिल्ली पोलिसांनी मोडून काढलं. वांगचुक यांचं उपोषण मोडीत काढल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. आता दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने उद्या आयोजित केलेल्या आंदोलनातही विरोधी पक्षाचे नेते सामील होण्याची शक्यता आहे. एकीकडे कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाला राजकीय वळण लागल्याचाही आरोप सत्ताधारी भाजप नेते करत आहेत. त्यांतर होणाऱ्या आरोपाला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सोनम वांगचुक यांच्यावर केलेल्या कालच्या कारवाईचा संदर्भ देऊन देशात हुकूमशाही सुरू झाल्याचा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आज रविवारी माध्यमांशी संवाद साधला. राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, ‘महात्मा गांधींनीही ब्रिटिशांच्या काळात उपोषण केलं. २१ -२१ दिवस उपोषण करून ब्रिटिशांना चर्चेला आणलं. पण स्वातंत्र्यानंतर सोनम वांगचुक जेव्हा विद्यार्थ्यांसाठी उपोषण करतात तेव्हा सरकार चर्चा करत नाही. २० व्या दिवशी नामर्दाप्रमाणे काळोखात इतक्या मोठ्या माणसाला फरफटत नेलं. ज्याची उभं राहण्याची उपोषणाने ताकद नाही, त्यांच्यासाठी स्ट्रेचर आणलं नाही. त्यांच्यावर उपोषणाचा दबाव आणला’.
‘वांगचुक देशासाठी प्राणत्याग करण्यास तयार आहे. सरकार घाबरलं आहे. सरकारने मागण्यावर चर्चा करावी. धर्मेंद्र प्रधान धर्मात्मा नाही. ते मंत्री आहेत. त्यांच्यामुळे विद्यार्थी उद्ध्वस्त झाले आहे. सरकारची जबाबदारी आहे. पण पोलीस बळाचा वापर करून सरकार त्यांना अटक करत आहे. दीपकेंवर लाठीहल्ला करून त्यांना जखमी करत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर शाईफेक करायला प्रवृत्त करत आहे. या देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. उद्या संसदेचं अधिवेशन आहे. त्यात हा विषय येईल. उद्या दिल्लीत मोर्चा आहे, असेही ते म्हणाले.
‘याला राजकीय वळण आहे. तुम्हाला राजकीय भीती वाटली म्हणून तुम्ही वांगचुक यांना घेऊन गेला. ही राजकीय भीती आहे. तुम्ही डरपोक लोक आहात. तुम्ही ब्रिटिशांचे खबरी होता. त्यामुळे ब्रिटीशांची भीती वाटली नाही. तुम्हाला नेहरू, दिपके, उद्धव ठाकरे, शिवसेना आणि वांगचुकची भीती वाटते. उद्याच्या मोर्चात आम्ही सर्व सहभागी होणार आहोत. संसदेचे सर्व सदस्य मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती देखील संजय राऊत यांनी दिली.
