Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या पक्षात उलथापालथ, बड्या नेत्यांची पदं काढली; तातडीच्या आदेशामुळं एकच खळबळ!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता या पक्षातील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. तत्काळ प्रभावाने हा आदेश लागू करण्यात आला आहे.

Sharad Pawar NCP : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या पक्षात मोठ्या घडामोड घडत आहेत. शरद पवार यांचा पक्ष लवरच एनडीएत सहभागी होऊ शकतो, असं बोललं जातंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. आम्ही एनडीएत सामील होणार नाही, असं अनेक नेत्यांनी सांगितलंय. परंतु दुसरीकडे पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. असं असतानाच आता शरद पवार यांच्या पक्षाने तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकारणात एकच खळबळ उडाली आहे
नेमका निर्णय काय?
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. पक्षाकडून अधिकृतपणे महेश तपासे आणि माजी आमदार विद्या चव्हाण हे दोन नेते माध्यमांसमोर आपली भूमिका मांडतील, असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ट्विट करत याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांच्या इतर सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पक्षाच्या आदेशात नेमकं काय?
शरद पवार यांच्या पक्षाच्या ट्विटर हँडलवर एक पत्र पोस्ट करण्यात आले आहे. या पत्रावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची सही आहे. या पत्रानुसार ‘शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने, आज दि. ४ ऑगस्ट २०२६ पासून यापूर्वी पक्षाच्या प्रवक्तापदासाठी करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहेत. तसेच, या कालावधीत माजी आमदार मा. श्रीमती विद्या चव्हाण आणि श्री. महेश तपासे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील. याबाबत सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी’ असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाने असा निर्णय का घेतला? इतर प्रवक्त्यांना आपल्या पदावरून का हटवलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच भविष्यात शरद पवार यांच्या पक्षात नेमकं काय घडणार? असंही विचारलं जात आहे.