छगन भुजबळांसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार ? गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटलय…

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यात छगन भुजबळ यांची सुरक्षा देखील काढण्यात आली आहे.

छगन भुजबळांसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार ? गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटलय...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 01, 2022 | 2:57 PM

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यावरूनच छगन भुजबळ यांना सुरक्षा मिळावी यासाठी नाशिकच्या राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीनं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे सुरक्षा मिळावी याकरिता मागणी करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे म्हंटले आहे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अति महत्वाची राजकीय व्यक्ती असून त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात यावी नमूद केले आहे. याशिवाय संपूर्ण देशात छगन भुजबळ यांचे दौरे सुरू असतात, त्यात जीवाला धोका असल्याने त्यांना काढलेली सुरक्षा पुन्हा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यात छगन भुजबळ यांची सुरक्षा देखील काढण्यात आली आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, छगन भुजबळ हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महत्वाचे नेते आहे. तसेच अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष देखील आहे.

समाजात नावलौकिकता आणि प्रतिष्ठीत व्यक्तीची सुरक्षा राज्य सरकारकडून काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

भुजबळ हे ओबीसी नेते असून ते बहुजन समाजाच्या न्यायहाक्कासाठी नेहमी लढा देत असतात. समाजाच्या प्रश्नासाठी त्यांचा देशभर वावर असतो.

२००२ ते २००३ या कालावधीत ते राज्याचे गृहमंत्री असताना विविध गँगच्या हस्तकांना अटक करण्याचा निर्णय घेतला होता.

ओबीसी आरक्षण, मनुस्मृती जाळणे यासारख्या जिवंत प्रश्नांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

भुजबळ हे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात देखील काम करतात याठिकाणी सुद्धा त्यांना धोका असतो. विविध सनातनी संघटनांकडून भुजबळ यांना मारण्याच्या धमक्या वेळोवेळी मिळत असतात.

याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे कार्यकर्ते छगन भुजबळ यांच्या विरोधात नेहमी आंदोलने करतात आणि सनातनी प्रवृतींपासून त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षा पूर्वीप्रमाणे करण्यात यावी असे पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान या पत्राद्वारे केलेल्या मागणीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही निर्णय घेतात की या पत्राकडे दुर्लक्ष करतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.