Maratha Reservation | मनोज जरांगे यांचे आंदोलन संपणार ? मुंबईत पोहचण्यापूर्वी वेगवान हालचाली

Maratha Reservation | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईत पोहचण्यापूर्वीच त्यांचे आंदोलन संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. सरकारने तयार केलेला नवीन जीआर आणि राजपत्राचा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येणार आहे.

Maratha Reservation | मनोज जरांगे यांचे आंदोलन संपणार ? मुंबईत पोहचण्यापूर्वी वेगवान हालचाली
manoj jarange patil
| Updated on: Jan 26, 2024 | 9:43 AM

दत्ता कानवटे, नवी मुंबई, दि.26 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहे. आता नवी मुंबईत सभा घेतल्यानंतर ते मुंबईत दाखल होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जीआर तयार झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या मुख्य कार्यालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे. सरकारने तयार केलेला नवीन जीआर आणि राजपत्राचा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे वकिलांसोबत बैठक घेणार आहे. गरज भासल्यास त्यात बदल सूचवणार आहे. अन्यथा हा जीआर निघणार नाही. यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन आज संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारी पातळीवर वेगवान हालचाली

मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघाले. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात दाखल होताच सरकारकडून हालचाली वेगाने सुरु झाल्या. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मनोज जरांगे यांना भेटले. त्यानंतरही मनोज जरांगे यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर मनोज जरांगे पाटील पुणे जिल्ह्यात दाखल होताच पुण्याचे विभागीय आयुक्तांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. परंतु ती चर्चा यशस्वी झाली नाही. त्यामुळे मनोज जरांगे नवी मुंबईत दाखल झाले.

आता नवीन मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे. सरकारच्या मसुद्यावर मनोज जरांगे वकिलांसोबत बैठक घेणार आहे. मनोज जरांगे यांना मसुदा मान्य झाल्यास स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना जीआर देणार आहे.

मनोज जरांगे यांची सभा

आज मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी आपला दैनंदिन उपक्रम सुरु ठेवला आहे. आता नवी मुंबईत वाशीच्या शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे सभा घेणार आहे. या सभेसाठी असंख्य मराठा बांधव शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत दाखल होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची ही अखेरीची सभा असणार आहे. आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही? अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.