
सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मुंबई सागरी किनारा मार्गांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले आहे. या मार्गामुळे वांद्रे आणि मरीन ड्राईव्ह हे अंतर दहा मिनिटांनी कमी होणार आहे. २७ जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी हा मार्ग खुला होत असून मरीन ड्राइव्ह ते वांद्रे अवघ्या १५ मिनिटांत पोहचता येणार आहे. मुंबई कोस्टर रोड दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहनांसाठी खुला रहाणार आहे. मुंबईकरांना मरीन ड्राइव्हवरून कोस्टल रोड, वरळी-वांद्रे सी लिंक आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे थेट दहिसरपर्यंत विना सिग्नल शिवाय थेट प्रवास करता येणार आहे.
मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट (एमसीआरपी) प्रकल्पाचा भाग असलेला संपूर्ण धनुष्यबाणाच्या आकाराचा आर्च ब्रिज सोमवारपासून (२७ जानेवारी) वाहनांच्या वाहतूकीसाठी सुरु होणार आहे. ज्यामुळे वांद्रे आणि मरीन ड्राइव्ह दरम्यानचा प्रवास वेळ १० मिनिटांनी वाचणार आहे. मुंबईकरांना कोस्टल रोडसाठी सात वर्षांची वाट पाहावी लागली आहे. वारंवार मुदतवाढ दिल्याने कोस्टल रोड प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च ८,००० कोटी रुपयांवरून १३,००० कोटी रुपयांपर्यंत गेला. त्यामुळे या मार्गात्या खर्चात ६१% वाढ झाली आहे. पाचव्या टप्प्यात कोस्टल रोड संपूर्ण क्षमतेने प्रवाशांसाठी खुला केला जात आहे. यासोबतच, वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन इत्यादी भागातील प्रवाशांसाठी तीन इंटरसिटी मार्ग देखील खुले झाले आहेत.
कोस्टल रोडचे बांधकाम खरेतर ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले होते, मुंबई महानगर पालिकेने डिसेंबर २०२३ मध्ये तो खुला होईल असा दावा केला होता. पण पालिका या कामात अपयशी ठरली. ५ व्या टप्प्यात मुंबई महानगर पालिकेने हा मार्ग पूर्ण क्षमतेने खुला केला आहे. पहिल्या टप्प्यात बिंदू माधव ठाकरे चौक (वरळी) ते मरीन ड्राइव्ह पर्यंतचा दक्षिण लेन (९.२९ किमी) ही ११ मार्च २०२४ रोजी खुली करण्यात आली होती.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १० जून रोजी, मरीन ड्राइव्ह ते हाजी अली मार्गे लोटस जंक्शनपर्यंतचा नॉर्थ लेन (६.२५ किमी) खुला करण्यात आला होता.तिसऱ्या टप्प्यात हाजी अली येथील खान अब्दुल गफार खान रोड ते वांद्रे-वरळी सी लिंक ( तात्पुरते, ३.५ किमी) जोडणारा मार्गिका ११ जुलै २०२४ रोजी उघडण्यात आला. चौथ्या टप्प्यात १३ सप्टेंबर २०२४ रोजी वांद्रे बाजूपासून मरीन ड्राइव्हपर्यंत मार्गिका सुरू करण्यात आली होती.
मुंबई कोस्टल रोडच्या वरुन श्रेयावरुन उद्धव ठाकरे गट आणि महायुती यांच्या कलगीतुरा रंगला आहे. कोस्टल रोडची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी केली होती असा दावा ठाकरे गट करीत आहे. तर भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी केंद्राकडून सर्व परवानग्या घेतल्या होत्या, त्यामुळे कोस्टल रोड मोदींमुळे झाला असा दावा फडणवीस करीत आहेत.
कोस्टल रोडच्या रिकाम्या जागांवर राजकीय होर्डिंग्ज लावण्याची परवानगी भाजप आणि शिवसेनेच्या दबावामुळे पालिका देत असल्याचा आरोप उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने खुलाही झाला नव्हता तेव्हा पासून श्रेयासाठी होर्डींग बाजी सुरु आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी हे आरोप नाकारले आहेत. कोस्टल रोडवरील रिकाम्या जागेवर होर्डिंग्ज लावले जाणार असले तरी ही जागा आमची नसल्याचे मुंबई महानगर पालिकेने स्पष्ट केले आहे.
– कोस्टल रोडचा एसआरडीपी १९६७ मध्ये झाला होता
– १९ एजन्सींकडून परवानगी घ्यावी लागली
– सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर २०१८ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले.
– मलबार हिल टेकडी आणि समुद्राखाली बोगदा बांधणे हे सर्वात मोठे आव्हान होते.
कोस्टल रोड सुरू नागरिकांसाठी खुला होत आहे, परंतु कोस्टल रोडवरील कामाच्या गुणवत्तेवर अनेक वेळा प्रश्न निर्माण झाले आहेत. वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत कोस्टल रोडवरील बोगदा उघडल्यानंतर आत पाणी गळती सुरु झाली होती. त्याच वेळी, सी लिंक आणि कोस्टल रोडच्या कनेक्टर पुलातील गॅपचा मुद्दा समोर आला होता. पावसाळ्यात कोस्टल रोडच्या अंडरपासमध्ये समुद्राचे पाणी भरल्याचे उडकीस आले होते
महाराष्ट्र आणि देशातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, आमचं संविधान आम्हाला मार्ग दाखवत राहो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कोस्टल रोड आणि इतर 3 मार्गिकांचे लोकार्पण आज झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या काळात 2 टप्प्यांचं लोकार्पण झाले होते. फेब्रुवारी अखेरीस शेवटचा टप्पा पूर्ण होणार आहे. उद्यापासून वरळी सी लिंकला जोडणारी मार्गिका खुली होत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आङे. महायुतीच्या वतीने हा सागरी मार्ग आम्ही लोकांना समर्पित करत आहोत. कोस्टल रोडच्या लगत सौंदर्यीकरण केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नवीन मुख्यमंत्री उरलेल्या कोस्टल रोडचे उदघाटन करतील आणि श्रेय घेण्यासाठी मुंबईत राजकीय होर्डिंग दिसतील अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कोस्टल रोड हा उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील प्रकल्प असून 2012 च्या जाहीरनाम्यात कोस्टल रोडचा समावेश आम्ही केला होता, याच्या सर्व परवानग्या आम्ही आणल्या आणि काम देखील आम्ही केले. वरळी शिवडी कनेक्टरचे काम आमच्या काळात 48 टक्के झालं होते, त्यानंतर शिंदे सरकारच्या काळात केवळ 9 टक्के काम झालं असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.