OBC Maha Elgar Sabha : आमचं ठरलयं! महाएल्गार सभेत गोपीचंद पडळकर कडाडले, ओबीसी समाजाला दिला नवा मंत्र
आज बीडमध्ये ओबीसी समाजाची महाएल्गार सभा सुरू आहे, या सभेमध्ये बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे, ओबीसी विरोधात मराठा समाज असं चित्र सध्या पहायला मिळत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा होत आहे, या सभेमध्ये बोलताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
ते आमच्यात भांडण लावत आहेत, आमचं ठरलंय, आमचा नेता एकच आहे, छगन भुजबळ. माधव हा फॉर्म्युला आपण राजकारणात पाहिला होता. माधव म्हणजे कृष्ण. ती कृष्णनीती आपण आवलंबली पाहिजे. सर्वांनीच हातात सुदर्शन चक्र घेण्याची गरज नाही. प्रत्येक वेळी आपल्या हातात बाण येईल असं नाही. कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो. आपला अर्जुन व्यासपीठावर आहे. बाण त्यांच्या हातात आहे. आपण कार्यकर्ते आहोत. ओबीसीत फूट पाडण्यात येत आहे, फूट पडावी म्हणून त्यांनी पिल्लू सोडलं धनगरांना एसटीमधून आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे. तुमचा बाप तिकडे बसलाय तो विरोध करायला लावतो. हे कळत नाही का? धनगर वेडे वाटतात का रे, घोडे लावण्याच्या तयारीत आहोत, आमच्या नादाला लागू नका, असा इशारा यावेळी गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, धनगरांना दोन भूमिकेत जावं लागेल. धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही प्राथमिकता आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढू. सरकारविरोधात लढू, ही प्राथमिकता आहे. पण ३४६ जातींचा समूह असलेल्या ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी देखीलआमची आहे. दोन भूमिकेत धनगरांना जावं लागेल. वंजारी समाजाचा आदर्श घ्या. लढायचं कसं, उभं कुठं राहायचं, अधिकारी कसं व्हायचं हे शिकलं पाहिजे. आपला माळी समाज एकजूट आहे. शांत आणि संयमी आहे. आणि म्हणून हे माधव आहे. माधव म्हणजे माळी, धनगर वंजारी, हा आता माधवराव करावा लागणार आहे. माळी, धनगर, वंजारी, रामोशी आणि वडार म्हणजे माधवराव, असंही यावेळी गोपिचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
