तुमच्या फार्महाऊसवर…भुजबळांना मागितली थेट 1 कोटींची खंडणी; नेमकं प्रकरण काय?

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते छगन भुजबळ हे नेहमीच चर्चेत असतात. मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षणाची बाजू लावून धरली होती.

तुमच्या फार्महाऊसवर...भुजबळांना मागितली थेट 1 कोटींची खंडणी; नेमकं प्रकरण काय?
chhagan bhujbal
| Updated on: May 17, 2025 | 3:17 PM

 Chhagan Bhujbal : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते छगन भुजबळ हे नेहमीच चर्चेत असतात. मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षणाची बाजू लावून धरली होती. दरम्यान, आता याच छगन भुजबळ यांना तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार छगन भुजबळ यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी राहुल भुसारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खास बाब म्हणजे ही खंडणी मागण्यासाठी संबंधीतांनी चांगलीच शक्कल लढवली आहे. एक कोटी रुपयांची खंडणी मागताना मी प्राप्तिकर विभागाचा अधिकारी असल्याचा बनाव संबंधिताने केला आहे.
तुमच्या फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात पैसे आहेत. त्यामुळे तिथ धाड पडणार आहे. मी देखील प्राप्तिकर विभागाचा अधिकारी आहे. धाड टाकणाऱ्या टीममध्ये माझा सहभाग आहे. तुम्हाला मदत हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावे लागतील, असं संबंधिताने भुजबळ यांना धमकावलं असून एका प्रकारे खंडणीच मागितली आहे.

राहुल भुसारे या व्यक्तीला ताब्यात घेतलं

हे प्रकरण समोर आल्यानंतर भुजबळ यांचे स्वीय सहायक संतोष गायकवाड यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनाही या प्रकरणाचा तत्काळ तपास चालू करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी नाशिक-गुजरात महामार्गावरून करंजाळी येथून राहुल भुसारे या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. यानेच अशा प्रकराची खंडणी मागितला होता, असा पोलिसांना संशय आहे.

भुजबळ राज्यातील महत्त्वाचे नेते

दम्यान, पोलीस या खंडणीच्या घटनेची चौकशी करत आहेत. भुजबळ हे राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. त्याच्या भूमिकेला राज्याच्या राजकारणात मोठे वजन आहे. सध्या ते अजित पवार यांच्या पक्षात आहेत. अजित पवार यांनी मात्र त्यांचा यावेळी मंत्रिमंडळात समावेश केलेला नाही. याच कारणामुळे ते नाराज असल्याचेही त्यावेळी म्हटले जात होते. सध्या त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले तर मला आनंदच होईल, अशी भूमिका घेतलेली आहे.