कांद्याला 12.35 रुपये दर; शेती परवडेना आता, गांजा लागवडीची परवानगी द्या.. शेतकऱ्याचे तहसीलदारांना पत्र

शेती करणे अवघड बनल्याने शेतकरी धास्तावले आहेत. एका शेतकऱ्याने कांद्याला मिळणारा तुटपुंजा दर पाहून आपला तोटा भरून काढण्यासाठी आता गांजा लागवडीस परवानगी द्यावी अशी असे पत्रच तहसिलदारांना दिले आहे.

कांद्याला 12.35 रुपये दर; शेती परवडेना आता, गांजा लागवडीची परवानगी द्या.. शेतकऱ्याचे तहसीलदारांना पत्र
Onion farming loss : file photo
| Updated on: May 29, 2026 | 6:27 PM

कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील शेतकरी रडकुंडीला आला आहे. शेतीचा धंदा आता आतबट्ट्याचा व्यवहार बनला असताना आता कांद्याची शेती हा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. आता जुन्नर येथील एका शेतकऱ्याने वाढता उत्पादनाचा खर्च आणि अत्यल्प बाजारभाव यामुळे शेती करणे अवघड झाल्याने आता आपल्याला गांजाची लागवड करण्याची परवानगी द्यावी असे जाहीर पत्र तहसीलदारांना पाठवले आहे.

महाराष्ट्रात कांद्याचे भाव घसरल्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बियाणे, खते, मजुरी आणि वाहतुकीचा वाढता खर्च पाहता शेतमालाला योग्य किमान आधारभूत किंमत (MSP) मिळणे गरजेचे बनले आहे.त्यात आता शेतकऱ्यांनी आता अभिनव मार्गाने निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने वाढता उत्पादन खर्च आणि अत्यल्प बाजारभावामुळे शेती करणे अवघड झाल्याची भावना व्यक्त करीत चक्क तहसीलदारांना गांजा लागवडीस परवानगी मागणारे पत्र दिले आहे. नाफेडचा 12 रुपये 35 पैसे किलो दर परवडत नसल्याने मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्याने म्हटले आहे.

शेतकरी सुनील उकिर्डे यांनी पत्रात काय म्हटले

जुन्नर तालुक्याच्या डिंगोरे गावातील शेतकरी सुनील उकिर्डे यांनी तहसीलदारांना दिलेल्या या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. कांदा शेतीत मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. आम्ही 2025-26 हंगामात दहा एकर कांद्याची लागवड केली होती. त्यामध्ये एकरी 1 लाख 20 हजार रुपये खर्च झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. शासनाने नाफेडमार्फत जाहीर केलेला 12.35 रुपये किलो खरेदी दर परवडत नसून त्यामुळे एकरी 40 ते 45 हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सुनील उकिर्डे यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे शेती करणे अवघड बनल्याची भावना व्यक्त करत तोटा भरून काढण्यासाठी आता गांजा लागवडीस परवानगी द्यावी अशी मागणी सुनील उकिर्डे यांनी पत्रातून केली आहे.

Follow Us