Wardha Gondia Rain : वर्ध्यातील गिरड शिवारात वीज पडून 23 बकऱ्या ठार, गोंदियात बैलजोडीचा मृत्यू

| Updated on: Jul 10, 2022 | 10:01 PM

गोंदिया जिल्ह्यात आज दुपारपासूनच दमदार पाऊस विजांच्या कडकडाटासह सुरू आहे. दरम्यान तिरोडा तालुक्यातील बोदा येथे वीज पडून बैलजोडी ठार झाल्याची घटना घडली. यात तिरथलाल बालचंद पारधी या शेतकऱ्याची बैलजोडी ठार झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Wardha Gondia Rain : वर्ध्यातील गिरड शिवारात वीज पडून 23 बकऱ्या ठार, गोंदियात बैलजोडीचा मृत्यू
पावसासह वीज पडून बकऱ्या, बैलजोडीचा मृत्यू
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : वर्ध्यातील गिरड शिवारात (Gird Shivar) आज दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली. गिरड येथील बाबा फरीद दर्गा टेकडीवर मनोज फोफारे (Manoj Fofare) स्वतःच्या बकऱ्या चारत असताना पाऊस सुरू झाला. संपूर्ण बकऱ्या मोठ्या झाडाच्या खाली उभ्या होत्या. यावेळी आकाशात जोरदार वीज कडाडली. यात झाडावर वीज कोसळल्याने त्याच्याखाली असलेल्या 23 बकऱ्या जागीच ठार झाल्या. यात काही बकऱ्या सैरावैरा पळून गेल्याने बचावल्या. बकरी (Bakri)चरण्यासाठी गेलेला मुलगा काही अंतरावर असल्याने थोडक्यात बचावला. यात श्रीराम फोफारे याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

गोंदियात वीज कोसळून बैलजोडी ठार

गोंदिया जिल्ह्यात आज दुपारपासूनच दमदार पाऊस विजांच्या कडकडाटासह सुरू आहे. दरम्यान तिरोडा तालुक्यातील बोदा येथे वीज पडून बैलजोडी ठार झाल्याची घटना घडली. यात तिरथलाल बालचंद पारधी या शेतकऱ्याची बैलजोडी ठार झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही बैलांची किंमत 50 हजार रुपये होती. ऐन शेतीच्या हंगामात बैलजोडी ठार झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

चंद्रपुरात मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी

दोन तासांच्या मुसळधार पावसाने चंद्रपूरला चांगलेच झोडपले. हवामान खात्याने जिल्ह्याला पावसाच्या अति सतर्कतेचा 72 तासांचा रेड अलर्ट दिलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील 15 तालुक्यात पैकी पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. दोन तासांच्या मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील सखल भाग जलमय झालाय. जिल्ह्यातील जीवती- पोंभुर्णा -गोंडपिपरी- वरोरा-मूल या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जलमय स्थिती आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांवर पाणीच पाणी झाले आहे. महत्त्वाच्या वाहतूक शाखा टी पॉईंटवर नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. महिला मुले व वृद्ध यांना दुचाकीवरून हा रस्ता पार करणे अवघड झाले आहे. वाहतूक शाखा चौकात सातत्याने होणाऱ्या वेगवान जलप्रवाहाच्या समस्येकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.

हे सुद्धा वाचा