मोठी बातमी! अपघात वार, रायगड आणि कणकवलीत भीषण अपघातात एकूण 13 दगावले; मृतांमध्ये चार महिला

| Updated on: Jan 19, 2023 | 8:03 AM

हा अपघात अत्यंत भीषण होता. तो इतका की ट्रकच्या धडकेमुळे कारचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. संपूर्ण कार चक्काचूर झाली आहे. अपघातात ट्रकच्या पुढच्या भागाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

मोठी बातमी! अपघात वार, रायगड आणि कणकवलीत भीषण अपघातात एकूण 13 दगावले; मृतांमध्ये चार महिला
car accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महेश सावंत, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, रायगड: रायगड आणि कणकवलीत आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकूण 13 जण ठार झाले आहेत. रायगडमधील अपघातात 9 ठार झाले आहेत. तर कणकवलीतील अपघातात 4 ठार झाले आहेत. आज पहाटे रायगड येथे झालेल्या भीषण अपघातात 9 जण जागीच ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात काहीजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास करत आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे 5च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील रेपोली गावाजवळ हा अपघात झाला. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं. या अपघातात एकूण 9 प्रवाशी ठार झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तर अपघातात एक चार वर्षाचा मुलगाही जखमी झाला आहे. जखमी मुलाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

कारचा चेंदामेंदा

हा अपघात अत्यंत भीषण होता. तो इतका की ट्रकच्या धडकेमुळे कारचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. संपूर्ण कार चक्काचूर झाली आहे. अपघातात ट्रकच्या पुढच्या भागाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

काम अपूर्णच

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वीही असंख्य अपघात झाले आहेत. या महामार्गावरील अपघातांची मालिका अजूनही थांबताना दिसत नाही. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्प्याचं काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघात होत असतात असं सांगितलं जातं.

कणकवलीत चार ठार

दरम्यान, कणकवलीतही भीषण अपघात झाला आहे. कणकवलीत आरामबस उलटून 4 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झालाय.

पहाटे 4 वाजता हा अपघात झाला असून या अपघातात 4 ठार तर 23 जण जखमी असल्याची माहिती मिळतेय. गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला, ही बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती.

या बस 36 प्रवासी होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.

धांगवडीत ट्रॅक्टर पलटला

तर, पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी येथे दोन ट्रॅक्टर पलटल्यानं अपघात झाला आहे. ऊस गाळपासाठी राजगड कारखान्यात घेऊन जात असताना धांगवडी गावजावळील चढावर दोन ट्रॅक्टर उसानी भरलेली ट्रॉली ओढत असताना ते पलटल्यानं हा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, मात्र दोन्हीही ट्रॅक्टरच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.