पूरग्रस्तांसाठी पॅकेज कधी जाहीर करणार?; अजित पवार म्हणतात…

| Updated on: Jul 27, 2021 | 1:19 PM

राज्यात अतिवृष्टी होऊन आठ दिवस होत आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते सत्ताधारी मंत्री आणि विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहे. (Ajit Pawar)

पूरग्रस्तांसाठी पॅकेज कधी जाहीर करणार?; अजित पवार म्हणतात...
ajit pawar
Follow us on

कोल्हापूर: राज्यात अतिवृष्टी होऊन आठ दिवस होत आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते सत्ताधारी मंत्री आणि विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहे. मात्र, अजूनही पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलेलं नाही. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. जोपर्यंत सर्व चित्रं स्पष्ट होत नाही, तोपर्यंत पॅकेजची घोषणा करता येत नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पॅकेजसाठी पूरग्रस्तांना अजून दोनचार दिवस वाट पाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Ajit Pawar said, we will declare flood relief package soon)

अजित पवार यांनी आज कोल्हापुरात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी परिस्थितीची माहिती देतानाच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. जो पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. तो पर्यंत पॅकेजची घोषणा करता येणार नाही. आता तातडीची मदत सुरूच आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही 9 जिल्ह्याच्या मदतीसाठी पुढं आलं पाहिजे. दानशूरांनी सढळ हस्ते मदत करावी, असं आमचं आवाहन आहे, असं अजित पवार यांनी केलं.

राज्यपाल दौऱ्यावर नो कमेंट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत. त्यांच्यासोबत आमदार आशिष शेलार आहेत. याबाबत अजितदादांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, राज्यपालांनी कोणाला सोबत घेऊन जावं हा त्यांचा प्रश्न आहे. मला यावर काही बोलायचं नाही, असं ते म्हणाले.

सरकार अस्थिर करू नका

यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. निवडणुकीत आपली भूमिका मांडायची असते. बहुमत आल्यावर त्यांना सरकार स्थापनेसाठी मुभा द्यावी. ते सरकार केंद्राच्या विचारांच आहे की नाही ते पाहू नये, असंही त्यांनी सांगितलं.

समुद्र किनारी संरक्षण भिंत ही नुसती चर्चा

शहर स्वच्छतेसाठी पुणे, मुंबईतून वाहन आली आहेत. आजून ही काही वाहन येत आहेत, असं सांगतानाच समुद्राच्या बाजूला संरक्षण भिंत बांधणार ह्या फक्त बातम्या आहेत. असा कोणताही निर्णय झालेला नाही. ही फक्त एक मागणी आहे. ज्या ज्या जिल्ह्यात हे संकट आले तेथील लोकांना उभं करण्याच काम महाविकास आघाडी करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गडकरींशी चर्चा करणार

रस्ते वाहतुकीबाबत केंद्रीय नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. भराव टाकून पूल तयार करू नये ही ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे. पंचगंगा नदीमधील गाळ वाढला असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. तीही शक्यता तपासून पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारखान्याच्या ठिकाणी वसाहत करून अशा लोकांच तात्पुरत स्थलांतर करता येईल का हा प्रस्ताव ठेवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

अलमट्टीमुळे महापूर नाही

अलमट्टी धरणाबाबत दोन्ही राज्यांनी समन्वय साधला आहे. अलमट्टीमूळे महापूर येतो असं अभ्यास समितीने म्हटलेलं नाही. सगळ्या नागरिकांना मदत करणयाची सरकारची भूमिका आहे. जसे जसे पाणी ओसरत आहे तसे पंचनामे होतील. पिकांच्या नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांना आज भेटणार

राज्यातील पूरस्थितीची आम्ही सर्वांनीच पाहणी केली आहे. आज संध्याकाळी मी, जयंत पाटील आणि विश्वजीत कदम मुंबईला जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना पूरस्थितीची माहिती देणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी स्वत: दिल्लीशी संपर्क साधून आहोत, असंही त्यांनी सांगितलं. (Ajit Pawar said, we will declare flood relief package soon)

 

संबंधित बातम्या:

Sharad Pawar : महाराष्ट्राला महापुराचा तडाखा; शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 5 महत्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावं; शरद पवार म्हणाले…

कोल्हापूर, सांगलीला अलमट्टी धरणामुळे महापूर नाही, अजित पवारांनी नेमकं कारण सांगितलं

(Ajit Pawar said, we will declare flood relief package soon)