पंढरपुरात भाजपचा विजय हा जनतेने ठाकरे सरकारविरोधात दिलेला कौल, समाधान आवताडे यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: May 02, 2021 | 4:31 PM

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथी भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली (pandharpur mangalwedha bypoll election result 2021)

पंढरपुरात भाजपचा विजय हा जनतेने ठाकरे सरकारविरोधात दिलेला कौल, समाधान आवताडे यांची पहिली प्रतिक्रिया
समाधान आवताडे यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल (pandharpur mangalwedha bypoll election result 2021) आज जाहीर होतोय. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीसह पंढरपूरच्या पोटनिवडणुकीची मतमोजनी सुरु आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथी भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळतेय. मात्र, आतापर्यंत मतमोजनीच्या समोर आलेल्या सर्व फेऱ्यांमध्ये समाधान आवताडे आघाडीवर दिसत आहेत (pandharpur mangalwedha bypoll election result 2021).

30 फेऱ्यांमध्ये भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

आतापर्यंत मतमोजनीच्या 30 फेऱ्यांपेक्षा जास्त फेऱ्या झाल्या आहेत. सर्व फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार समाधाव आवताडे आघाडीवर दिसत आहेत. सध्याची परिस्थितीत बघता समाधान आवताडे यांचा विजय निश्चित मानला जातोय. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय. भाजप नेते प्रशांत पारिचारक यांच्या घरी कार्यकर्ते जमले आहेत. तिथे समाधान अवताडे देखील आहेत. कार्यकर्त्यांनी उत्साहात गुलाल देखील उधळला आहे. विजयाची औपचारिक घोषणा होण्याआधी आम्ही समाधान आवताडे यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आपला विजय निश्चित असून औपचारिक घोषणेची वाट बघत असल्याचं सांगितलं.

समाधान आवताडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

“विजय आमचा निश्चित आहे. फक्त औपचारिकता राहिली आहे. त्याची वाट बघतोय. त्यानंतर सविस्तर भूमिका मांडेल. प्रशांत पारिचारिक आणि सर्व पंढरपुराने ताकद दिली होती. विजय हा जनतेचा आहे. या सरकार विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. गुलाल कार्यकर्त्यांनी उधळलेला आहे. विजय आमचाच होणार आहे. फक्त उतावीळपणा नको”, अशी प्रतिक्रिया समाधान आवताडे यांनी दिली.

प्रशांत पारिचारक यांची प्रतिक्रिया काय?

यावेळी प्रशांत पारिचारक यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “आमचा विजय निश्चित आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. त्यामुळे उतावीळ न होता थोडं संयमाने घेणं आवश्यक आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. त्याचाच यामध्ये विजय बघायला मिळतोय. राज्य सरकारची सगळी यंत्रणा या ठिकाणी होती. तरीसुद्धा लोकांपुढे आम्ही एकत्र गेलो. लोकांना विश्वास दिला. या तालुक्यात आम्ही गेले 30 ते 40 वर्षे काम केलं. सगळ्याच कार्यकर्त्यांनी जिद्दीने जिंकायची आशा केली होती. त्याचाच हा विजय आहे. विरोधकांना निकालाने उत्तर दिलं आहे. मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

समाधान आवताडे नेमकं काय म्हणाले बघा व्हिडीओत :

हेही वाचा : देशात भाजपविरोधी लाट, ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या: छगन भुजबळ