उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळा, अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करणार, रोक सके तो रोक लो : किरीट सोमय्या

| Updated on: Sep 20, 2021 | 10:09 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर किरीट सोमय्यांनी कडाडून हल्ला चढवला.

उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळा, अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करणार, रोक सके तो रोक लो : किरीट सोमय्या
उद्धव ठाकरे, किरीट सोमय्या अजित पवार
Follow us on

सातारा: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवलं. सोमय्यांनी तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर किरीट सोमय्यांनी कडाडून हल्ला चढवला. कराडमध्ये पोलिसांनी थांबवल्यानं किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. येत्या गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळ्यांची पाहणी करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यास जाणार असून अडवून दाखवा, असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे.

किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे

मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे, तिथेही असाच घोटाळा आहे. पुढच्या सोमवारी 27 तारखेला मा. उद्धव ठाकरे साहेबांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उद्धव ठाकरेंची दडपशाही सुरु असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला आहे. 30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार. मला रोखणार आहे का?, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

ठाकरे सरकारची ठोकशाही

“ठाकरे सरकारची ठोकशाही आहे. गणेश विसर्जनापासून रोखलं, अंबाबाईच्या दर्शनापासून रोखलं, csmt स्टेशनबाहेर मला रोखलं, ट्रेन मिळणार नाही हे पाहिलं, धक्काबुक्की केली. मी विचारलं कोणत्या अधिकाराअंतर्गत रोखताय, त्यावर त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांबाहेर जाण्यापासून रोखण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने दिला असं सांगितलं. आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का? याचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणाले.”

“जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे रोखण्याचा मला ठाकरे सरकारने प्रयत्न केला. मी आदेशाची कॉपी मागितली, त्यात लिहिलं होतं, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलाय सोमय्यांना मुंबई बाहेर जाऊ देऊ नये. त्यावर मी आक्षेप घेतला, त्यावर पोलीस पळून गेले.”

“माझी मागणी गृहमंत्री वळसेपाटीलांकडे ज्या पोलिसांनी गैर कायदेशीरपद्धतीने ऑर्डर दाखवली, कोल्हापूर पोलिसांची ऑर्डर, कराड पोलिसांनी दिली, या ऑर्डरमध्ये किरीट सोमय्यांना मुंबईतून बाहेर पडू देऊ नका असं कुठेच नाही. मग मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खोट्या ऑर्डरची जबाबदारी स्वीकारणार का? आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का?”, असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांची दडपशाही, आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने सगळं होतंय

“हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या दडपशाहीमुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने होत आहे, आमचं चॅलेंज त्यांना आहे. माझी पहिली हरकत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आहे. पहिली जबाबदारी गृहमंत्री वळसे पाटील यांची आहे.”

“ठाकरे सरकार कितीवेळा दडपशाही करणार? हसन मुश्रीफांच्या घोटाळ्याविरोधात कागल पोलीस स्टेशनमध्ये जात होतो. सरसेनापती कारखाना त्या हद्दीत येतो. मी तक्रार केल्यानंतर ७ दिवसात कोर्टात जाऊ शकतो. मी अंबाबाईचं दर्शन घेणार हे तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. अंबाबाईचं दर्शन बाहेरुन करणार होतो.”, असंही सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी हिरवा रंग धारण करावा

आम्ही हिंदू म्हणून रोखता? उद्धवजी तुम्ही हिरवा रंग धारण करा, मला विसर्जनापासून, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखता, उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा चालणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार, चुकीच्या आदेश देणाऱ्या मुंबई पोलिसांवर कारवाई व्हावी, मुंबई पोलिस कमिशनरवर कारवाई व्हावी, असं किरीट सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या:

मुश्रीफांच्या घोटाळ्यात पहिल्यांदाच शरद पवारांना ओढलं, किरीट सोमय्यांनी थेट नाव घेतलं

गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा, हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांचा दुसरा हल्ला, उद्या तिसरा घोटाळा बाहेर काढणार

BJP Leader Kirit Somaiya said he will visit illegal bungalow of Uddhav Thackeray on name of Rashmi Thackeray and visit Jarandeshwar Sugar Mill in next few days