Nanded Crime: नांदेडमध्ये स्वस्त धान्य दुकानाची चौकशी चालू असतानाच तक्रारदाराची हत्या

| Updated on: Jan 05, 2022 | 10:27 PM

मनूर गावातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात जादा भावाने धान्य वाटप करणे, पावती न देणे, लाभार्थ्यांशी अरेरावी करणे अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी सहा महिन्यांपूर्वी 194 लाभार्थ्यांच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आल्या होत्या.

Nanded Crime: नांदेडमध्ये स्वस्त धान्य दुकानाची चौकशी चालू असतानाच तक्रारदाराची हत्या
मयत धोंडीबा पोलावार
Follow us on

नांदेड : उमरी तालुक्यातील मनूर गावात स्वस्त धान्य दुकानाची तपासणी सुरू असताना दुकानदाराच्या मुलाने एका तक्रारदाराची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी नांदेडमधील उमरी तालुक्यात घडली आहे. पूर्ण गावाच्या समक्ष ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गावातील वृद्धाला मारहाण केली. या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. धोंडीबा शंकर पोलावार(65) असे मयत वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे उमरी तालुक्यात प्रचंड खळबळ माजली आहे.

स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात अनेक तक्रारी

मनूर गावातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात जादा भावाने धान्य वाटप करणे, पावती न देणे, लाभार्थ्यांशी अरेरावी करणे अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी सहा महिन्यांपूर्वी 194 लाभार्थ्यांच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात संबंधित दुकानदाराची दुसऱ्यांदा चौकशी करण्यासाठी मंडळ अधिकारी मयुर शेळके, तलाठी लक्ष्मण सोनर हे आज मनूर या गावात आले होते. यावेळी गावातील 194 पैकी 117 रेशन कार्ड धारकांचे जबाब महसूल अधिकाऱ्यानी घेतले. उर्वरित लाभार्थी जबाब देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात येत होते.

धोंडिबा पोलावार जबाब नोंदवण्यासाठी येत असतानाच त्यांना मारहाण

ही प्रक्रिया चालू असतानाच स्वस्त धान्य दुकानदाराचा मुलगा शिवाजी मनूरकर याने गावातीलच लाभार्थी धोंडीबा पोलावार हे जबाब देण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये येत असतानाच त्यांना वाटेतच गाठून शिवीगाळ केली. यावेळी या वृद्धाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे धोंडिबा पोलावार हे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मयत धोंडीबा पोलावार यांचा मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेमुळे मनूर गावात एकच खळबळ माजली आहे.

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विक्रांत गायकवाड यांनी उमरीत येऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. याप्रकरणी मयताचा मुलगा बालाजी पोलावार यांच्या तक्रारीवरून शिवाजी दिगंबर मनूरकर, राजेश गोपीनाथ मनूरकर, चक्रधर गोपीनाथ मनूरकर, गणेश कोंडजी मनूरकर व गोविंद कोंडजी मनूरकर या पाच जणांविरुद्ध उमरी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले हे करीत आहेत.

पुरवठा विभागाचे अभय आणि घडले हत्याकांड

गावातील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी सुरू असताना स्वस्त धान्य दुकानदाराचा मुलगा आपल्या काही सहकाऱ्यांसह ग्रामपंचायत कार्यालयात बसला होता. यावेळी तक्रारदारांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराच्या मुलाला ग्रामपंचायतमध्ये बसू देऊ नये, अशी विनंती महसूलच्या अधिकाऱ्यांना केली. परंतु या अधिकाऱ्यांनी त्याला दाद दिली नाही आणि आपली चौकशी तशीच सुरू ठेवली असे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, चौकशी चालू असताना संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचा मुलगा शिवाजी मनूरकर याला मंडळ अधिकारी, तलाठी यांनी मुद्दामच ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी स्थळी बसवून ठेवले. ही बाब बेजबाबदारपणाची असून यामुळेच लाभार्थ्याला त्यांनी मारहाण केली. त्यातूनच हा हत्येचा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप मनूर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. भगवान मनूरकर यांनी केला. या घटनेस जबाबदार धरून मंडळ अधिकारी व तलाठी यांना त्वरित निलंबित करून बडतर्फ करावे अशी मागणी डॉ. भगवान मनूरकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र खंदारे यांचेकडे केलीय.

नांदेडचा पुरवठा विभाग कायम वादग्रस्त

राज्य भरात गाजलेल्या धान्य घोटाळ्याची पाळेमुळे नांदेड जिल्ह्यातीलच आहे. गोर गरिबांच्या तोंडचा घास थेट कारखान्यांना विकण्याचा पराक्रम इथल्या पुरवठा विभागाने केला होता. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्र किशोर मीना यांनी हा मोठा धान्य घोटाळा उघडकीस आणला होता. मात्र तपासाच्या नावाखाली यातील आरोपींना अभय मिळत गेले आणि हा घोटाळा दाबण्यात इथल्या भ्रष्ट यंत्रणेला एक प्रकारे यशच मिळालं अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हे धान्य घोटाळ्यातील आरोपी अजूनही फरारच आहेत.

शासकीय धान्य आणि काळाबाजार

नांदेडमध्ये गोरगरिबांच्या तोंडात दोन वेळेचे जेवण जावे म्हणून स्वस्त आणि अल्प दरात अन्न धान्य सरकार पुरवते. मात्र या धान्याचा कायमच काळाबाजार होत असतो, हे अनेकदा उघड झालंय. अनेक राजकीय पक्षाचे युवानेते, दलाल, व्यापारी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांची ही सांगड अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. त्यातूनच एखाद्या सामान्य माणसाची हत्या करण्या इतपत मजल एका स्वस्त धान्य दुकानदारांची झालीय, काळ्या बाजाराचे हे षडयंत्र गोरगरिबांच्या मुळावर उठल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त केल्या जातोय. (Murder of a complainant against a cheap grain shop in Nanded)

इतर बातम्या

Kalicharan : कालीचरण बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी, पुणे सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

अमेरिकेतून आलेल्या वराला ब्लॅकमेल करणं भोवलं, मुलीसह कुटुंबियांवर गुन्हा, प्रकरण काय? वाचा सविस्तर