पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड इत्यादी तालुक्यांमध्ये शेतीच्या ऐन हंगामात आदिवासी शेतकऱ्यांच्या पशुधनावर रोगाची साथ आलीय. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गुरं बैलांवर उपचारासाठी आदिवासी शेतकरी पशु वैद्यकीय रुग्णालयात आणि उपचार शिबिरात असणाऱ्या ठिकाणी पशूंसह रांगा लावत आहेत. शेतीच्या ऐन हंगामात जनावरे आजारी पडल्याने शेतीची कामे करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागांमधील जनावरे लेम्पि स्किन डेसिस या रोगाने पछाडली आहेत. जनावरांच्या अंगावर पुळ्या फोड येत आहेत. हे फोड मोठे होऊन फुटून जनावरांना जखमा होत आहेत. पोळीला, पायाला सूज येत असून अशक्तपणाने जनावरांचे हाल होत आहेत. या अचानक उद्भवलेल्या जनावरांच्या आजाराने बैला अभावी शेतीची कामे रखडली आहे.
आधीच जोरदार पडणाऱ्या पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. असं असतानाच जनावरांवर हे संकट ओढवले आहे. पावसाळ्यात जनावरांचे गोठ्यात ओलावा जास्त असतो. त्यामुळे गोमाशा जनावरांच्या अंगावर भनभनत असतात त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात त्यांना होतो. प्रामुख्याने शेळीला होणारा हा आजार प्रथमच म्युटेड होऊन गुरं ढोरांवर झाला. यामुळे जनावरे आजारी पडत आहे.
“हा रोग प्रथमच पशुधनावर दिसून आला आहे. जिल्ह्यात जनजागृतीसह कॅम्प घेतले जात असून जनावरांना लस दिल्या जात आहेत. शेतकऱ्यानी गोचीड, गोमाशांची नियमित फवारणी करून गोठा स्वच्छ ठेवावा. जनावरांवर लक्षण दिसताच त्यांना त्वरित जवळच्या पशु वैद्यकीय रुग्णालयात नेऊन उपचार करावेत,” असं आवाहन जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी अजित हिरवे यांनी केलंय.