पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच; ठाकरे गटाच्या आमदाराची थेट पंकजा यांना ऑफर

राज्याचे गृहमंत्री वारंवर कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत असतात. कुणाचाही मुलाहिजा बाळगणार नाही असं सांगत असतात. आता कर्तव्य पाळण्याची वेळ आली आहे.

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच; ठाकरे गटाच्या आमदाराची थेट पंकजा यांना ऑफर
पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच; ठाकरे गटाच्या आमदाराची थेट पंकजा यांना ऑफर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 13, 2023 | 9:23 AM

नगर: भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या वारंवार चर्चा होत असतात. पंकजा मुंडे यांनीही अनेकवेळा पक्षाच्या नेत्यांवर टीका करून आपली नाराजीही व्यक्त केली आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटातून मोठी बातमी आहे. ठाकरे गटाने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचं आवतन दिलं आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. भाजपमध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं, असं आवाहन आमदार सुनील शिंदे यांनी दिलं आहे. ठाकरे गटाच्या या आवाहनाला पंकजा मुंडे प्रतिसाद देतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आमदार सुनील शिंदे हे पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शाखेचंही उद्घाटन केलं. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटना बांधणीवरही चर्चा केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्षही मोठा आहे. त्यामुळे त्यांनी काय मत व्यक्त केलं, त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही, असं सुनील शिंदे यांनी स्पष्ट केलं.

कर्तृत्वाला नेहमीच सलाम

पंकजा मुंडे या राज्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय. आपण सर्वच ते पाहत आहोत. अर्थात ही त्यांची पक्षांतर्गत बाब आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची नेहमीच आम्हाला कदर असेल. पण त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यांना जर शिवसेनेत यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

देश हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे. तपास यंत्रणा केंद्राच्या दबावाखाली काम करत आहेत. विरोधकांनाच फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपमध्ये गेल्यावर सर्व पापं धुतली जात आहे. यावरून काय ते कळून येतं, असंरही ते म्हणाले.

सरवणकरांवर कारवाई करा

यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली. सरवणकर यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी गोळीबार करून कायदा आणि सुव्यवस्थेला तेव्हा आव्हान दिलं होतं. ते स्पष्ट झालं आहे. गृहमंत्र्यांनी आता त्यांच्यावर कारवाई करावी.

राज्याचे गृहमंत्री वारंवर कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत असतात. कुणाचाही मुलाहिजा बाळगणार नाही असं सांगत असतात. आता कर्तव्य पाळण्याची वेळ आली आहे. त्यांनी कर्तव्यात कसूर करू नये ही मुंबईकराची इच्छा आहे, असा चिमटाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काढला.