आघाडी एकत्रित निवडणुका लढणार की स्वबळावर?; वाचा बाळसाहेब थोरात काय म्हणाले?

| Updated on: Jul 11, 2021 | 4:21 PM

आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की स्वबळावर? याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यातच काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सावध प्रतिक्रिया दिली आहे. (balasaheb thorat)

आघाडी एकत्रित निवडणुका लढणार की स्वबळावर?; वाचा बाळसाहेब थोरात काय म्हणाले?
बाळासाहेब थोरात
Follow us on

नगर: आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की स्वबळावर? याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यातच काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सावध प्रतिक्रिया दिली आहे. शक्य होईल तितक्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत, असं बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. (revenue minister Balasaheb Thorat refuse mid term election possibilities)

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील डोंगरावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे उत्तर दिलं. आघाडीतील तिघाही पक्षांना पक्ष वाढवण्याची गरज आहे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करत असतो. त्यात चुकीचे काही नाही. स्वबळाचा नारा शिवसेनेने दिला अस कुठंही मला दिसत नाही. शक्य होईल तितक्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत, असं थोरात म्हणाले.

मध्यावधी नाहीच

भाजपकडून मध्यावधी निवडणुकांची भाषा केली जात आहे. त्यावरही थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांना काही ना काही घोषणा करायची असते. पण ती प्रत्यक्षात उतरत नाही. मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. दोन वर्ष आघाडी सरकार चाललंय. आणखी तीन वर्षे हे सरकार पूर्ण करेल. एवढंच काय राज्यात पुन्हा आघाडी सरकार आलं तर त्यात आश्चर्य वाटू नये, असंही ते म्हणाले.

अध्यक्ष काँग्रेसचाच

विधानसभा अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या अफवांना त्यांनी पूर्णविराम दिला. शिवसेनेने अध्यक्षपदावर दावा केलेला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचाच उमेदवार असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच वन खाते रिक्त नाही. ते मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे कामास चांगली गती आहे, असंही त्यांनी सांगितलं.

समान नागरी कायद्यावर मतमतांतरे

समान नागरी कायद्याबाबत मतमतांतरे असतील. पण राज्यघटनेने काही अधिकार दिले आहेत. यावर चर्चा होवू शकते. यात आरक्षणही येत असल्याने अनेक घटक आज न्याय व प्रगतीपासून वंचित आहेत. त्यांनाही बरोबर घेऊन जाण्याच काम करावे लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कृषी कायद्यावर चर्चा

यावेळी त्यांनी राज्यातील कृषी कायद्यांवरही मत व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीत कृषी कायद्यांवर चर्चा झाली. त्यात काही बदल सूचवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या चांगल्या सूचना येतील त्याचा कायद्यात समावेश करण्यासाठी अंतिम निर्णय घेऊ, असं थोरात म्हणाले.

पाण्यावरून संघर्ष नाही

महाराष्ट्र-गुजरात पाणी प्रश्नावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. गुजरात-महाराष्ट्र पाणी प्रश्नावरून संघर्षाचे काही कारण नाही. पश्चिमेकडे खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील आपला भाग तुटीचे खोरे झाले आहेत. धरणे भरत नाहीत. कायम पाण्याचा तुटवडा येतो. ही टंचाई दूर करायची असेल तर पश्चिमेकडील समुद्रात जाणारे पाणी पूर्वेला घेणे ही काळाची गरज, असं ते म्हणाले.

आरक्षण का गेलं त्यावर अधिक चर्चा नको

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यालाही त्यांनी उत्तर दिलं. मराठा आरक्षण का गेल? यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही. 102 वी घटना दुरूस्ती काय आहे? राज्य सरकारकडे ते अधिकार आहेत का? सिद्ध झालंय की राज्य सरकारकडे ‌ते अधिकारच नाहीत. ती जबाबदारी आता केंद्राची आहे, असंही ते म्हणाले. (revenue minister Balasaheb Thorat refuse mid term election possibilities)

 

संबंधित बातम्या:

नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू?; शरद पवारांनी फटकारले

पवारसाहेबांनी पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला; नितेश राणेंची खोचक टीका

कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र पंकजा मुंडेंच्याविरोधात जाऊ शकतं का?; वाचा सविस्तर

(revenue minister Balasaheb Thorat refuse mid term election possibilities)