पोरींच्या अंगावरील उलटे कपडे पाहून पालकांना प्रश्न पडला; त्यानंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं

| Updated on: May 10, 2023 | 11:56 AM

सांगलीत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. नीट परीक्षेच्यावेळी हा प्रकार घडला आहे. परीक्षेच्यावेळी घडलेल्या या प्रकारामुळे पालक संतप्त झाले असून सांगलीतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पोरींच्या अंगावरील उलटे कपडे पाहून पालकांना प्रश्न पडला; त्यानंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं
examination centre
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली : सांगलीत एक अत्यंध धक्कादायक, घृणास्पद आणि लाज आणणारा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडल्यानंतरही मुली गप्प होत्या. पण जेव्हा विद्यार्थीनींच्या पालकांच्या लक्षात हा प्रकार आला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. असंही घडू शकतं या कल्पनेनेच सर्व हैराण झाले. संतापलेल्या पालकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत थेट तक्रार केली. पालकांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला आणि संपूर्ण महाराष्ट्र खडबडून जागा झाला. नेमकं काय घडलं सांगलीत?

संपूर्ण देशात 7 मे रोजी नीटची परीक्षा पार पडली. सांगलीतही असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी नीटची परीक्षा दिली. पण परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींना धक्कादायक प्रकाराला सामोरे जावं लागलं. सांगलीतील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थीनी परीक्षेला आल्या होत्या. पण परीक्षेला आलेल्या या विद्यार्थीनींना चक्क त्यांचे अंगावरील कपडे उलटे परीधान करायला सांगितले. तसेच या विद्यार्थीनींना अंतर्वस्त्रेही उलटे परीधान करायला सांगितले. विद्यार्थीनींनी ते ऐकलं आणि उलटे कपडे घालून परीक्षा दिली. त्यासाठी आदी या विद्यार्थीनींची तपासणीही करण्यात आली होती. त्यानंतर या सूचना देण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थीही उलट्या कपड्यात

विद्यार्थीनीच नव्हे तर विद्यार्थ्यांनाही उलटे कपडे घालून परीक्षा द्यायला सांगितलं गेलं. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही उलटे कपडे घालून परीक्षा दिली. तीन तास विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उलटे कपडे घालून परीक्षा देत होते. परीक्षा संपल्यानंतर उलटे कपडे परीधान केलेल्या अवस्थेतच या मुलांनी घरची वाट धरली. केंद्राबाहेर आलेल्या या विद्यार्थीनींच्या अंगावरील उलटे कपडे पाहून पालक संभ्रमात पडले. त्यांनी याबाबतचे कारण आपल्या पाल्यांना विचारलं. त्यावेळी विद्यार्थ्यांनी जे सांगितलं, त्याने पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रकार करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे या प्रकाराची तक्रार दाखल केली आहे.

कॉलेज प्रशासनाचे हातवर

दरम्यान, कस्तुरबा वालचंद महाविद्यालयाने या परीक्षेशी कॉलेजचा काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आम्ही फक्त वर्ग उपलब्ध करून दिले आहेत, असं महाविद्यालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे आता हा प्रकार कुणाच्या आदेशाने घडला? कशासाठी या सूचना दिल्या? कोणी सूचना दिल्या? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.