Taliye Landslide : तळीये दुर्घटनेच्या 15 दिवसांनी आणखी एक मृत्यू, मृतांचा आकडा 85 वर

| Updated on: Aug 06, 2021 | 5:01 PM

महाड तालुक्यातील तळीये (Taliya) दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या आज 85 वर पोहोचली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Taliye Landslide : तळीये दुर्घटनेच्या 15 दिवसांनी आणखी एक मृत्यू, मृतांचा आकडा 85 वर
Raigad Taliye Landslide - फाईल फोटो
Follow us on

रायगड : महाड तालुक्यातील तळीये (Taliya) दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या आज 85 वर पोहोचली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. संगीता कोंडाळकर असे मृत महिलेचे नाव आहे. जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 22 जुलैला दरड कोसळून तळीये हे अख्खं गाव उद्ध्वस्त झालं होतं. या गावात दुर्घटना झाल्यानंतर जवळपास 15 तास कोणीही पोहोचू शकलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी दुपारी टीव्ही 9 मराठीने याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर, राज्याला या दुर्घटनेची माहिती मिळाली.  (Taliye Landslide death toll reaches 85 Sangeeta Kondalkar died during treatment in J J Hospital Mumbai)

महाड तालुक्यातील तळीये (Taliye landslide) गावात दरड कोसळून 53 जणांचे मृतदेह सापडले होते. तर अनेकजण बेपत्ता होते. 22 जुलैला घडलेली ही घटना 23 जुलैला समोर आली होती. घटनेच्या पाच दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं . बचाव पथकाला 53 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर 31 नागरिक अजूनही बेपत्ता होते. “आम्ही या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 84 नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. आता फक्त सरकारने सर्वांना मृत घोषित करून मदत करावी आणि आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा”, असं आवाहन तळीयेचे सरपंच संपत तांदळेकर यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा तळीये दौरा

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तळीये गावाचा दौरा केला होता. 24 जुलैला मुख्यमंत्री तळीये गावात पोहोचले. “तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल”, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले. या दुर्घटनेत ज्यांचं नुकसान झालं आहे. त्यांचं सर्वांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांची सर्व कागदपत्रे त्यांना मिळवून देण्यात येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्व मदत करू. फक्त तुम्ही स्वत:ला सावरा, असंही त्यांनी सांगितलं.

तळीये गावाचं पुनर्वसन

दरम्यान, महाड – तळीये या गावातील ग्रामस्थांचे सुरक्षित जागी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच 60 घरांचे पुनर्वसन नवीन जागी केलं जाईल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  महाडमध्ये झालेल्या प्रलयंकारी पावसामुळे तळीये गावात दरड कोसळून त्यात 84 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता. पुण्यातील आंबेगाव येथील माळीण गावाप्रमाणेच तळीयेचे देखील लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची मागणी होत होती.

तळीयेमध्ये दरड कोसळली

22 जुलैला गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली होती.

संबंधित बातम्या  

तळीये ग्रामस्थांच्या पुनर्वसन प्रस्ताव तयार; लवकरच 60 घरांचे पुनर्वसन, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Taliya Landslide | हिरवीगार झाडं, डोंगर, पक्षांचा चिवचिवाट; दरड कोसळण्यापूर्वी तळीये गाव कसं होतं ?