“वजन,अक्कल काढत ठाकरे गट-शिवसेना भिडली”; आता ठाकरे गटाच्या नेत्याने लाचारी दाखवून दिली

| Updated on: Jun 06, 2023 | 8:06 PM

दीपक केसरकर यांची लायकी काढत, त्यांना ड्रायव्हरची उपमा देत राणे यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. तर आता मात्र सत्तेसाठी दोघंही मंत्री लाचार झाले असल्यामुळेच ते एकाच मंचावर दिसून आले असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

वजन,अक्कल काढत ठाकरे गट-शिवसेना भिडली; आता ठाकरे गटाच्या नेत्याने लाचारी दाखवून दिली
Follow us on

सिंधुदुर्गः राज्यात सत्तांतर झाल्यापासून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता आगामी काळातील निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षाकडून आता आगामी काळातील निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरु केली जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे.

सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपचे राज्य असले तरी त्याआधी कोकणामध्ये मंत्री दीपक केसरकर आणि राणे कुंटुंबीयांमध्ये जोरदार वाद सुरु होते.

तर आज मात्र दोन्ही मंत्री एकाच मंचावर दिसून आल्याने शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणे आणि केसरकर हे दोघेही सत्तेसाठी लाचार असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. त्यामुळे आता कोकणातील राजकारण प्रचंड तापले आहे.

आमदार वैभव नाईक यांनी टीका करताना नारायण राणे आणि दीपक केसरकर यांचा पूर्वेइतिहासही वाचून दाखवला आहे. कधी काळी मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे आणि त्यांच्या मुलाना आपण जिल्हा हद्दपार करु असा इशारा त्यांनी त्यांना दिला होता. तर दीपक केसरकर यांच्यावर राणे कुटुंबीयांनीही टीका केली होती.

दीपक केसरकर यांची लायकी काढत, त्यांना ड्रायव्हरची उपमा देत राणे यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. तर आता मात्र सत्तेसाठी दोघंही मंत्री लाचार झाले असल्यामुळेच ते एकाच मंचावर दिसून आले असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशत संपवणार असा इशारा त्यांनी त्यांना दिला होता. मात्र आता सत्तेसाठी लाचारी पत्करुन आणि मंत्री पदासाठी आरोप-प्रत्यारोप विसरुन दोघांनीही लाचारी पत्करली असल्याची टीका त्यांनी केली आहे.