अकोल्यात दोन गटात तुफान राडा, दगडफेक जाळपोळ, पोलिसांकडून हवेत गोळीबार; कारण काय?

| Updated on: May 14, 2023 | 7:04 AM

अकोल्यात काल रात्री तुफान राडा झाला. शेकडो लोक आमने सामने आल्याने दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यानंतर जाळपोळ करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवले.

अकोल्यात दोन गटात तुफान राडा, दगडफेक जाळपोळ, पोलिसांकडून हवेत गोळीबार; कारण काय?
akola
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अकोला : अकोल्यात दोन गटात तुफान राडा झाला आहे. शेकडो लोक एकमेकांसमोर आले आणि एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर जाळपोळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अकोल्यातील वातावरण चांगलंच पेटलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. तणाव अधिकच वाढल्याने अमरावतीहून एसआरपीच्या अतिरिक्त तुकड्या मागवल्या गेल्या. अकोल्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.

अकोल्यात एका सोशल मीडिया ग्रुपवर एक पोस्ट आली. त्यामुळे वाद झाला आणि शेकडो लोक रस्त्यावर उतरले या लोकांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही तरुणांनी बाईक, गाड्या आणि दिसेल त्या ठिकाणी आगी लावत प्रचंड जाळपोळ केली. त्यामुळे अकोल्यात अधिकच तणाव पेटला. रात्री उशिरा हा प्रकार घडल्याने सामान्य लोक घरातच घाबरून थांबले.

हे सुद्धा वाचा

100 बाईकस्वारांची दहशत

हा राडा सुरू असतानाच 100 हून अधिक बाईकस्वारांनी अकोल्यात फेरफटका मारत दहशत माजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोक अधिक भयभीत झाले. बाईकस्वारांचा ताफा पाहून अजून दगडफेक सुरू झाली. त्यामुळे अधिकच तणाव निर्माण झाला. या राड्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जोरदार लाठीमार करत या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक केली.

त्यामुळे पोलिसांनी लाऊडस्पीकरमधून शांततेचं आवाहन केलं. पण जमाव ऐकेनाच. शेकडो लोक रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरून दगडफेक करत जाळपोळ करत असल्याने पोलिसांनी अखेर हवेत गोळीबार केला. पोलिसांनी हवेत 12 राऊंड फायरिंग केली. त्यामुळे जमाव पांगला. त्यानंतर पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.

144 कलम लागू

शहरातील या राड्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. घोळक्यांनी उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील भागात अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाईकस्वारांची चौकशी केली जात असून बाईकची तपासणी केली जात आहे. तसेच दगडफेक करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. अमरावतीतून एसआरपीची तुकडी मागवली असून परिसरावर नजर ठेवली जात आहे.