कोयना धरणातून विसर्ग वाढवला, सांगलीत कृष्णेचं पाणी वाढलं, नदीकाठी धाकधूक कायम

कोयना धरणातून विसर्ग वाढवल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आमणापूर पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.

कोयना धरणातून विसर्ग वाढवला, सांगलीत कृष्णेचं पाणी वाढलं, नदीकाठी धाकधूक कायम
कोयना धरण
| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 8:40 AM

सांगली : कोयना धरणातून विसर्ग वाढवल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आमणापूर पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. आधीच महापुराने वेढलेल्या सांगलीला अजून पूर्णत: दिलासा मिळालेला नाही. मात्र येत्या काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला जात असल्याने, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे.

कोयना धरणाचा विसर्ग गुरुवारपासून 50 हजार क्यूसेकने वाढवण्यात आला. त्यामुळे सांगलीतील पलुस तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये धाकधूक आहे.  शुक्रवारपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ होताना दिसत आहे. आमणापूर येथे पाणी पातळीत रात्रीत दीड फुटाची वाढ झाली आहे.

पाणी पातळीत वाढ 

भिलवडीतील पाणी पातळीत दिवसभरात एका फुटाने वाढ होऊन सायंकाळी 7 वाजता 38.5 इंचावर पोहचली आहे. तर आमणापूर अंकलखोप पुलावर आज शनिवारी पहाटे सहापासून पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पुलावर दुसऱ्यांदा पाणी आले आहे. नागठाणे बंधारा हा गेल्या 9दिवसांपासून पाण्याखाली आहे‌. त्यातच काल संध्याकाळपासून तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे.

पूरग्रस्तांसाठी लवकरच पॅकेज 

महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज शेतकऱ्यांना देऊ असे आश्वासन मंत्री विश्वजित कदम यांनी दिले आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे फटका बसला आहे. कोल्हापूरसह सांगलीची जनताही मदतीच्या अपेक्षेत आहेत. आज कोल्हापूरला मुख्यमंत्री आले आहेत. पण सांगलीला येऊ शकले नाहीत. यावर मंत्री विश्वजित कदम म्हणाले येणाऱ्या काही दिवसातच मुख्यमंत्री सांगलीला पूरग्रस्त भागाची पाहणीसाठी येतील.

संबंधित बातम्या 

Sangali | लवकरच शेतकऱ्यांना मोठं पॅकेज देऊ, विश्वजित कदम यांचे आश्वासन

Follow Us