राजभवनावर जायला पाहिजे पण लोकं शेतात जाताय; उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

पुण्यात ईव्हीएमच्या विरोधात बाबा आढाव यांनी आत्मक्लेष उपोषण सुरु केले होते. त्यांच्या या उपोषणाला विरोधी पक्षाने पाठिंबा दिला होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. एकनाथ शिंदे यांना देखील त्यांनी डिवचलं आहे.

राजभवनावर जायला पाहिजे पण लोकं शेतात जाताय; उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
shailesh musale | Updated on: Nov 30, 2024 | 4:50 PM

पुण्यात बाबा आढाव यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केले आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तीन महिन्यात लोकांच्या मनात इतकं परिवर्तन कसे झाले असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. बाबा आढावा यांचा पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. बाबा आढावा यांची शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. याशिवाय अजित पवार यांनी देखील त्यांची भेट घेतली. अजित पवार यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांना पाणी पाजून त्यांचं उपोषण सोडलं.

जिंकलेल्यांना पण विश्वास नाही ते जिंकले कसे?

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, ‘बाबा आढाव यांची आजची भेट ही आयुष्यभर लक्षात राहिल. आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकले. आजही ते म्हातरपण स्वीकारायला तयार नाहीत. जिंकलेले पण इथे येताय आणि हारलेले पण इथे येताय. जिंकलेल्यांना पण विश्वास नाही की आपण जिंकलो कसे. वणवा पेटायला ठिणगी भरपूर असते. ती ठिणगी आज पडली आहे. सरकारने योजनेचे आमिष दाखवले. माझा साधा प्रश्न आहे. आरटीआयच्या माध्यमातून आपण जशी माहिती मागवतो. तसं माझं मत कुठे जातंय याची माहिती पण मिळाली पाहिजे. फेरमतमोजणी करताना व्हीव्हीपॅटच्या रिसीट मोजल्या का नाही जात.’

शेवटी ७६ लाख मतं वाढली कशी?

‘निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, ७६ लाख मतं शेवटी वाढली. शेवटच्या तासात कुठे हजार लोकांची रांग होती पाहायला मिळाले नाही. इतका मोठा विजय मिळाल्यानंतर ही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद का नाही. राजभवनावर जायला पाहिजे. पण लोकं शेतात जातायंत. दावा अजून कोणी केलेला नाही तरी राष्ट्रपती राजवट कोणी लावलेली नाही.’ असा सवाल ही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

आत्मक्लेश एकट्या व्यक्तीचा नाही देशाचा आहे – ठाकरे

‘कोणीतरी काय तरी चुकीचं करतंय हे सांगणारे कोणी तरी पाहिजे. बाबा सारखे अनुभवी लोकांना जर आता हे पटत नसेल तर आपण पुढे जाणार की नाही. एक विनंती आहे, आता आपण आत्मक्लेश करून घेऊ नका. हा आत्मक्लेश एकट्या व्यक्तीचा नाही. देशाचा आहे. बाबांसारख्या अनुभवी व्यक्तींना हे पटत नाही. असं कधीच घडलं नाही असं जेव्हा हा माणूस सांगतो. तेव्हा आपण पुढे जाणार की नाही. हम सब एक है, देशभर दिसलं पाहिजे. जनतेसाठी आंदोलन आहे. महााविकास आघाडीकडून हे आंदोलन राज्यभर नेलं पाहिजे. ज्यांना वाटतं गडबड झाली, ते सोबत येतील. जेव्हा जनआंदोलन होईल तेव्हा महात्मा फुलेंचं सत्यमेव जयते होईल.’ असं ही शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us