Jaykumar Gore : माझ्या बाबतीतही बीड सारखं घडविण्याचा कट, जयकुमार गोरे यांचा मोठा गौप्यस्फोट

Jaykumar Gore : "हा जयकुमार गोरे कधी मागे सरकणार नाही. माझ्या विरोधात अनेक षडयंत्र झाली, चक्रव्यूव तयार केले पण मी आधुनिक अभिमन्यू देवेंद्र फडणवीस यांचा पठ्ठा आहे" असं जयकुमार गोरे म्हणाले.

Jaykumar Gore : माझ्या बाबतीतही बीड सारखं घडविण्याचा कट, जयकुमार गोरे यांचा मोठा गौप्यस्फोट
Jaykumar Gore
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 04, 2025 | 8:47 AM

“माझ्या बाबतीतही बीड सारखं घडविण्याचा कट होता. पण मला याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे मी यातून वाचू शकलो. अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या कटात अडकवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते” असा गंभीर आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला. “यामध्ये अनेक जण सामील असून या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. सध्या पोलीस याचा तपास करीत असल्याने मी यावर कोणतेही विधान करणार नसलो, तरी पोलिसांची चौकशी झाल्यावर हे सर्व पुरावे आणि माहिती माध्यमांसमोर आणणार” असा जयकुमार गोरे यांनी इशारा दिला. पंढरपूर येथे कार्यक्रमात बोलताना पाकलमंत्री जयकुमार गोरे यांनी हा गौप्यस्फोट केला.

“मी यायच्या आधीच सांगोल्यात भूकंप झाल्याचं समजलं. कार्यक्रमाच्या स्टेजचे चित्र बघून भूकंपाचे कारण लक्षात आले. मी सांगोल्यात आल्यापासून फटाके वाजत आहेत. मला माण खटाव मध्ये असल्या सारखे वाटत आहे” असं जयकुमार गोरे म्हणाले. “आमच्याकडे एकमेकांना जेलमध्ये घालायची स्पर्धा लागली आहे. मात्र सांगोल्यात सर्व विरोधक एकत्र आले. राजकारणामध्ये आता एकमेकांवर सूड उगवण्याची पद्धत सुरू झाली. पण सांगोल्याला एक विचार आहे” असं मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.

शरद पवारांवर जयकुमार गोरे यांची अप्रत्यक्ष टीका

“निवडणूक झाल्यानंतर एकमेकांचे गळा भेट घेणारे उमेदवार सांगोल्यातच असू शकतात. आज शहाजी बापू पाटील यांनी बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सगळच केलं. ज्यांनी पाडलं त्यांना सोबत घेवून एकत्र येण्याची कला कुठं शिकवतात ते सांगा मी त्या शाळेत प्रवेश घेतो” असं जयकुमार गोरे म्हणाले. “स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी ज्यांच्यावर प्रेम केलं, त्यांनी आबांना तेवढं प्रेम दिलं नाही. सांगोल्याचा पाणी प्रश्न सोडवला नाही” शरद पवारांवर जयकुमार गोरे यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

माझा जन्म दुष्काळी गावातला

“बाबासाहेब देशमुख बिन पाण्याच्या विहिरीत उडी मारू नका. पाणी असणाऱ्या देवाभाऊ यांच्याकडे या. आमदार बाबासाहेब देशमुख यांना भाजप सोबत येण्याची ऑफर. माझा जन्म दुष्काळी गावातला. मी कधीही पाण्याला नाही म्हणणार नाही. पाणी नीट वापरा. एकदाही मंत्री पद मागितले नाही किंवा खातं मागितलं नाही. पण मला देवेंद्र फडणवीस यांनी न मागता मंत्रीपद दिलं” असं जयकुमार गोरे म्हणाले.

मर्दाची अवलाद असाल तर समोर येऊन लढा

“जन्मल्यापासून मरेपर्यंत जे जे लागतं, ते सगळं ग्रामविकास खात्याकडे आहे. अनेक जाणते राजे झाले. शेतकऱ्यांचे नेते पण कुठलाही प्रश्न सोडवला नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे तिसऱ्यांदा सरकार आले. ज्या पालखीमध्ये जाण्यासाठी मी तडफडत होतो, त्या पालखीचे नियोजन करण्याची संधी मला मिळाली. मी आमदार होऊ नये, मंत्री होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले आणि मंत्री झाल्यावर देखील मला त्रास दिला. खरंच मर्दाची अवलाद असाल तर समोर येऊन लढा” षडयंत्र रचणाऱ्या विरोधकांना जयकुमार गोरे यांनी आव्हान दिलं.