
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. तसेच मुंबई मेट्रो लाईन-3 चा अंतिम टप्प्याचेही उद्घाटन झाले. यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाच्या आणि मुंबईच्या विकासावर भाष्य केले. त्याचबरोबर मुंबईवरील हल्ल्याचा उल्लेख करत कोणत्या विदेशी ताकदीच्या दबावामुळे काँग्रेस सरकार पाकिस्तानवर हल्ला करण्यास कचरले? असा सवालही उपस्थित केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भारताचं मुंबई हे सर्वात व्हायब्रंट शहर आहे. दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. तेव्हा काँग्रेसचं सरकार सत्तेत होतं. त्यांनी दहशतवाद्यांसमोर गुडघे ठेवले. काँग्रेसचा एक मोठा नेता. देशाचा गृहमंत्री राहिला आहे. त्यांनी एक खुलासा केला. त्याने दावा केला की, आमचे सैन्य मुंबई हल्ल्यानंतर पाकवर हल्ला करण्यास तयार होता. देशही तयार होता. पण कोणत्या तरी देशाच्या दबावाखाली काँग्रेसने पाकिस्तानवर हल्ला करू दिला नाही. काँग्रेसने सांगावं विदेशी दबावातून निर्णय घेतला तो कोण होता. देशाला हे जाणून घ्यायचं आहे.’
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, ‘काँग्रेसच्या या कमजोरीने दहशतवाद्यांना बळ दिलं. देशाच्या सुरक्षेला कमकुवत केलं. त्यामुळे देशाला वारंवार जीव गमवावे लागले. आमच्यासाठी देश आणि देशवासियांपेक्षा महत्त्वाचं कुणीही नाही. आजचा भारत दमदार उत्तर देतो. आजचा भारत घरात घुसून मारतो. ऑपरेशन सिंदूरवेळी जगाने पाहिलंय आणि अभिमानाचा क्षणही अनुभवला आहे.’
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘भारत हा एमआरओ हब बनावा हे आमचं लक्ष आहे. त्यातही रोजगाराच्या संधी निर्माण केली जाणार आहे. आमची ताकद तरुण आहेत. त्यामुळे आमच्या धोरणाचा फोकस तरुणांना रोजगार देण्यावर आहे. पायाभूत सुविधा तयार केल्यावर रोजगार मिळतो. व्यापार वाढतो तेव्हा रोजगार वाढतो. राष्ट्र नीतीही राजनीतीचा आधार असतो अशा संस्कारातून आम्ही आलोय. आमच्यासाठी पायाभूत सुविधांवर लागणारा पैसा देशवासियांचं सामर्थ्य वाढवण्यावर आहे.’