PM Modi On Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

"वयानेही ते माझ्यापेक्षा मोठे होते. त्यांना राज्यातील अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. अनेक विभाग त्यांनी हाताळले होते. राज्याला त्याचा फायदा होत होता. मंत्रिमंडळात विषय यायचे तेव्हा ते राज्याची आर्थिक परिस्थिती सांगून काटकसर करायला सांगायचे. शिस्तीचा नेता होते. त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबीयांचंच नव्हे तर राज्याचं न भरून येणारे नुकसान झालं आहे" असं एकनाथ शिंदे म्हणाले.

PM Modi On Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
Narendra Modi-Ajit Pawar
| Updated on: Jan 28, 2026 | 12:38 PM

आज महाराष्ट्रावर दु:खाच डोंगर कोसळलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा दुर्देवी विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती विमानतळाजवळ सकाळी पावणेनऊच्या सुमारास अजित पवार यांचं विमान लँडिंग करताना कोसळलं. अजित पवारांसोबत या विमानात सहाजण होते. या अपघातात सर्वांचा मृत्यू झालाय. अजित पवार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट केलीय.

अजित पवार हे लोक नेते होते. तळागाळातील जनतेशी त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्याविषयी जनतेमध्ये प्रचंड आदराची भावना होती. ते मेहनती होते. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी ते सदैव पुढे असायचे. त्यांना प्रशासकीय विषयांची उत्तम समज होती. समाजातील गरीब आणि पिचलेल्या घटकांसाठी ते खूप आत्मीयतेने, तन्मयतेने काम करायचे. ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. त्यांचं अकाली निधन ही खूप धक्कादायक आणि दु:खद बातमी आहे. त्यांचे असंख्य पाठिराखे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ओम शांती” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांच्या निधनानंतर एक्सवर ही पोस्ट केलीय.

“महाराष्ट्रात बारामती येथे झालेल्या विमान अपघाताच्या बातमीबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. या अपघातात ज्यांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं, त्या सर्वांच्या दु:खात मी सहभागी आहे. या अतिशय दु:खद प्रसंगात ज्यांनी आपल्या स्व‍कीयांना गमावलय त्या कुटुंबांना बळ आणि हिम्मत मिळो अशी प्रार्थना करतो” असं पीएम मोदींनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलय.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“मनाला वेदना देणारी आणि दुर्देवी घटना आहे. स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून निघून जातील. महाराष्ट्रासाठी ही अतिशय दुर्देवी घटना आहे. अजितदादा गेले अनेक वर्ष राज्याच्या राजकारणाचं नेतृत्व करत होते. अतिशय परखड, स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आम्ही पाहिली आहे. प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास करून बोलण्याची त्यांची सवय होती. रोखठोक बोलणारे असले, चूकीला चूक म्हणणारे असले तरी मनाने निर्मळ होते” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकदा एखादी गोष्ट ठरवली तर अजितदादा करायचे

“त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात काम केलं. मुख्यमंत्रीपदी असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. त्यावेळी आर्थिक तरतूद अत्यंत उत्कृष्टपणे अजितदादांनी केली होती. त्याचा अनुभव मला आहे. एकदा एखादी गोष्ट ठरवली तर अजितदादा करायचे. करतो, बघतो हे त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. करणारं काम करायचे. नाही होणारं काम ते करायचे नाही. आम्ही टीम म्हणून काम करत होतो” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

वयानेही ते माझ्यापेक्षा मोठे होते

“आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात. अजितदादांनी पहाटे सहा सहा वाजताही अपॉइंटमेंट दिल्या आहेत. वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपला आहे. काल परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली. सरन्यायाधीश आले होते. ते येण्यापूर्वी आम्ही तिथेच एका चेंबरमध्ये बसलो होतो. त्यावेळी गप्पा रंगल्या होत्या. आज जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्याच आठवणी जाग्या झाल्या. माझ्यापेक्षा ते राजकारणातही अनुभवी नेते होते” असं एकनाथ शिंदे म्हणाले.