
Police Bharti : राज्यभरात आज (11 फेब्रुवारी) पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच मैदानी चाचणीसाठी उमेदवार ग्राउंडवर हजर झालेले पाहायला मिळाले. जालना, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, वर्धा, अकोट अशा महत्त्वाच्या शहरात पोलीस भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, भरती प्रक्रिया नियमानुसारच पार पडावी यासाठी अनेक उपायोजना करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. तर काही ठिकाणी कोणत्याही अफवेला तसेच प्रलोभनांना बळी पडू नका असे आवाहन करत पोलीस भरती प्रक्रियेतील गैरप्रकार थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. असे असले तरी बीड जिल्ह्यात एक दुर्दैवी प्रकार घडला आहे. येथे एक उमेदवार धावत असताना भोवळ येऊन पडल्याची घटना घडली. यातच पुढे त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्वरित ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
जालना जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या 156 जागेसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शक पार पडावी यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली. दरम्यान पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कुणी अमिष दाखवत असेल तर त्या आमिषाला बळी न पडता तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा असा आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही ग्रामीण पोलीस भरतीसाठी उच्चशिक्षित तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. येथे ग्रामीण पोलीस दलातील ५३ पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये ४९ पोलीस कॉन्स्टेबल आणि ४ बँडसमन पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी तब्बल साडेचार हजारांहून अधिक तरुणांनी अर्ज केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विनायकुमार राठोड यांनी दिली. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने उच्चशिक्षित तरुण सहभागी झाले आहेत. एकूण ६६७ उमेदवार उच्चशिक्षित असून त्यामध्ये विविध व्यावसायिक आणि पदव्युत्तर पदवीधरांचा समावेश आहे. उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पोलीस भरतीसाठी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान आणि कायदा शाखेतील उमेदवारांनी अर्ज केल्यामुळे सुशिक्षित तरुणांचा सरकारी नोकरीकडे वाढता कल स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये पोलीस दलात कार्य करण्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
वर्धा शहरातही पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. येथे 134 जागांसाठी 7313 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. पोलीस भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. इतर जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानावर पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भरती प्रक्रियेसाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता राखली जाणार असून, उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. धावणे, गोळाफेक यांसारख्या मैदानी चाचण्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली घेतल्या जात आहेत. पोलीस भरती ही केवळ आणि केवळ उमेदवारांच्या कष्टावर आणि गुणवत्तेवर आधारित असणार आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली. पोलीस भरती पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे, आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. पोलीस भरती सोळाशे मीटर हंड्रेड मीटर आणि गोळा फेक यासाठी मैदानी चाचणी होत आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील १५० पोलीस शिपाई आणि 11 बॅडसमन जागांसाठी भरती प्रक्रियेला होत आहे. तब्बल 13 हजार 500 उमेदवारांनी यासाठी अर्ज केला आहे. पहिल्याच दिवशी 750 तरुण मैदानात आपली ताकद दाखवणार असून, 25 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी 400 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यात पोलीस विभाग कडून मोफत वाहन व्यवस्था आणि निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
बीडमध्ये पोलीस भरतीदरम्यान एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. 1600 मीटर धावताना त्याला भोवळ आली होती.
बीडमध्ये 174 पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. उमेदवाराला भोवळ आल्याने त्या तरुणाला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डीहायड्रेशनमुळे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.