बाळ जन्मलं अन् महिलेचा गेला जीव, खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका… अख्खा महाराष्ट्र हळहळला!

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील घोडनकप्पी गावात खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने प्रसूतीनंतर 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बाळ जन्मलं अन् महिलेचा गेला जीव, खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका... अख्खा महाराष्ट्र हळहळला!
Chandrapur HealthCare Issue
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 16, 2026 | 3:53 PM

केंद्र आणि राज्य सरकार देशातील आरोग्य व्यवस्थेवर लाखोंचा कर्च करते, मात्र अजूनही ग्रामीण भागात आरोग्यसेवा मिळत नसल्याते समोर आले आहे. चंद्रपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्यामुळे प्रसूतीनंतर एका 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संगीता गेडाम असं या महिलेचे नाव असून जिवती तालुक्यातील दुर्गम असलेल्या घोडनकप्पी गावातील ही घटना आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रसुतीनंतर रक्तस्त्राव…

समोर आलेल्या माहितीनुसार, घोडनकप्पी हे गाव तेलंगाना सीमेवर असून दुर्गम असलेल्या या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. संगीता गेडाम या गर्भवती महिलेची आठव्या महिन्यात घरीच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर या महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने आरोग्य विभागाला याची माहिती देण्यात आली. मात्र खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका गावात येऊ शकली नाही आणि यातच या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेबाबत जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करण्यात येत होती. सोबतच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घोडनकप्पी गावात रस्ता नसल्यामुळे संबंधित महिलेला आधीच माहेरी जाण्याची किंवा पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या महिलेची पूर्ण व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्या महिलेनेच माहेरी जाण्यास किंवा आरोग्य केंद्रात राहण्यास नकार दिला होता आणि आठव्या महिन्यातच त्या महिलेची प्रसूती झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे.

हिंगोलीतही बाळाचा मृत्यू

याआधी हिंगोलीत डिझेल नसल्याचे कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याने बाळाचा मृत्यू झाला होता. हिंगोलीच्या जवळा बाजार येथे ही धक्कादायक घटना घडली होती. एका गरोदर महिलेला डिझेल नसल्याचे कारण देत रुग्णवाहिका नाकारल्यामुळे ती वेळेत रुग्णालयात पोहोचू शकली नाही, त्यामुळे महिलेला आपले बाळ गमवावे लागले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता.

रोहिणी खडसे यांनी एका सोशल माडिया पोस्टमध्ये सरकारला, ‘सरकारने सांगावे यात दोषी कोण आहे ? आरोग्य प्रशासन ? रुग्णवाहिकेचे कर्मचारी? की शासन जे पेट्रोल डिझेलबाबत परिस्थिती हाताळण्यासाठी अपयशी ठरले आहे ? त्या बाळाची एकाप्रकारे हत्याच झाली आहे. सांगा कुणावर 320 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे? असे सवाल विचारले होते.

 

Follow Us