हा कौल प्रगतीचा, अधिक गती देणारा…, महापालिका निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

महापालिका निवडणुकीमध्ये राज्यात भाजपला प्रचंड यश मिळालं आहे, 29 महापालिकांपैकी तब्बल 25 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून जनतेचे आभार मानले आहेत.

हा कौल प्रगतीचा, अधिक गती देणारा..., महापालिका निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
Prime Minister Narendra Modi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 16, 2026 | 9:33 PM

गुरुवारी राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदार प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज आता महापालिका निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यात भाजपाला मोठं यश मिळालं आहे. 29 महापालिकांपैकी जवळपास 25 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता येणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. मुंबईमध्ये भाजप शिवसेना युतीनं शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का दिला. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची पिछेहाट झाली आहे, दरम्यान भाजपला मिळालेल्या या यशानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ट्विट केले आहेत.

नेमकं काय म्हणाले मोदी? 

‘महाराष्ट्राचे आभार ! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा , राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.’ असं मोदी यांनी म्हटलं आहे.

 

तर त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये महाराष्ट्र भाजपचं अभिनंदन केलं आहे. ‘महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Follow Us