पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता द्या, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा आरोग्यमंत्र्यांना प्रस्ताव

पुणे शहरात कोरोना निर्बधांमध्ये शिथिलता द्या, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे आता आरोग्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.

पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता द्या, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा आरोग्यमंत्र्यांना प्रस्ताव
मुरलीधर मोहोळ, राजेश टोपे
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 9:39 PM

पुणे : राज्यातील 25 जिल्ह्यात राज्य सरकारकडून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, पुण्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध लागू आहेत. त्याविरोधात सर्वसामान्य पुणेकरांसह, व्यापारी आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कोरोना निर्बधांमध्ये शिथिलता द्या, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे आता आरोग्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे. (Demand for relaxation of corona restrictions in Pune city)

पुणे शहरात शिथिलता देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेकडे प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज प्रस्ताव वाठवला आहे. उद्या होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत पुण्यातील शिथिलतेबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही काल पुण्यातील कोरोना निर्बंधांवरुन राज्य सरकारवर टीका केली होती. 4 टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही कळत नाही? असा सवाल त्यांनी केला होता.

पुण्यातील व्यापारी आक्रमक

मागील तीन दिवसांपासून पुण्यातील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात दुकानांसाठी दुपारी 4 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मात्र, पुण्यातील व्यापाऱ्यांनी नियमांना बगल देत संध्याकाळी 7 पर्यंत दुकाने सुरु ठेवली आहे. पहिल्या दिवशी पोलिसांकडून व्यापाऱ्यांची दुकानं बंद करण्यात आली. मात्र, कालपासून पोलीस फक्त दंडात्मक कारवाई करत आहेत. आमच्यावर कारवाई केली तरी आता आम्ही संध्याकाळपर्यंत दुकानं सुरुच ठेवणार, अशी आक्रमक भूमिका पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतलीय.

व्यापाऱ्यांनो संयम सोडू नका – मुख्यमंत्री

ज्या ठिकाणी निर्बंधामध्ये शिथिलता द्यायची त्या ठिकाणी ही शिथिलता दिली आहे. पण याचा अर्थ कोणी लाडका आहे आणि कोणी दुश्मन आहे असं नाही, असं सांगतानाच राज्यातील नागरिकांनो आणि व्यापाऱ्यांनो संयम सोडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही तिथल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो की कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या :

केंद्राचं आरोग्य पथक पुण्याच्या झिकाबाधित गावात, पाहणीनंतर प्रशासकिय अधिकाऱ्यांसोबत बैठक, केंद्राला अहवाल देणार

Pune Lockdown : पुण्यातील दुकाने पोलिसांकडून बंद करण्यास सुरुवात, व्यापारी संतप्त, फतेचंद रांकांनी दुकान सुरुच ठेवलं

Demand for relaxation of corona restrictions in Pune city

Follow Us