आजपासून तुमच्या हॉटेलमध्ये हे करावंच लागणार, FDA चा कडक नियम काय?

पुणे शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये आता शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे स्वतंत्र तयारी, प्रक्रिया आणि शिजवणे बंधनकारक आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हा नवीन नियम लागू केला आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई होईल.

आजपासून तुमच्या हॉटेलमध्ये हे करावंच लागणार, FDA चा कडक नियम काय?
hotel food 3
| Updated on: Jun 15, 2025 | 12:17 PM

पुणे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे तयार करणे, त्यांची प्रक्रिया करणे आणि शिजवणे बंधनकारक असणार आहे. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अन्न सुरक्षा हा केवळ एक कायदेशीर मुद्दा नाही, तर ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील जबाबदारी आहे. अनेकदा एकाच ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र हाताळल्यास किंवा शिजवल्यास भेसळीची शक्यता वाढते. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः धार्मिक आणि नैतिक कारणांमुळे शाकाहारी लोक मासांहारी हॉटेलमध्ये जेवण करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे शिजवावावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना तात्काळ नोटीस बजावून कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आता अधिक दक्ष राहावे लागणार आहे.

अन्न सुरक्षेबाबतचे आवश्यक प्रशिक्षण

एफडीए अन्न सुरक्षेबाबत जनजागृती आणि प्रशिक्षण देण्यासाठीही सक्रिय आहे. गेल्यावर्षी अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील सुमारे ३० हजार हॉटेल व्यावसायिकांना अन्न सुरक्षेबाबतचे आवश्यक प्रशिक्षण दिले आहे. यावर्षी हा आकडा वाढवून एक लाख व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन प्रशासनाने केले आहे. यामुळे अन्न सुरक्षेबाबत व्यावसायिकांमध्ये जागरूकता वाढेल. तसेच नियमांचे पालन अधिक चांगल्या प्रकारे होईल अशी अपेक्षा आहे.

याव्यतिरिक्त, नागरिकांनाही अन्न भेसळ किंवा अन्न सुरक्षेशी संबंधित कोणतीही तक्रार नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. नागरिक हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून किंवा ‘Food Safety Connect App’ च्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवू शकतात. ग्राहकांनी जागरूक राहून अशा नियमांच्या उल्लंघनाबाबत प्रशासनाला माहिती दिल्यास अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल.