भरधाव कार थेट 200 फूट खोल कालव्यात कोसळली; पुणे, पालघर आणि हिंगोलीतील भीषण अपघातात 8 ठार

| Updated on: May 25, 2023 | 12:30 PM

पुणे, हिंगोली आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात आठ जण ठार झाले आहेत. तर तिघेजण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकजण गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भरधाव कार थेट 200 फूट खोल कालव्यात कोसळली; पुणे, पालघर आणि हिंगोलीतील भीषण अपघातात 8 ठार
Road Accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रविण चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे : राज्यात आज झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहेत. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. एक अपघात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात झाला आहे. दुसरा अपघात पालघर येथे झाला आहे. तिसरा अपघात हिंगोलीत झाला आहे. दौंडमध्ये कार 200 फूट खोल कालव्यात कोसळली. पालघर येथे दुचाकी आणि आर्टिका कारमध्ये धडक होऊ अपघात झाला. तर हिंगोलीत चालकाला डोळा लागल्याने आयशरने ट्रकला धडक दिली. दौंडमधील अपघातात दोन, पालघरमधील अपघातात दोन आणि हिंगोलीत 4 जण जागीच ठार झाले आहेत.

दौंड तालुक्यातुन जाणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मळद गावच्या हद्दीमध्ये पुण्याहून सोलापूरकडे जाताना हा अपघात झाला. खासगी बस आणि कारमध्ये काल रात्रीच्या वेळी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. बलवंत विश्वनाथ तेलंगे आणि नामदेव जीवन वाघमारे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

हे सुद्धा वाचा

क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर

या अपघातात कार 200 फुट खोल कालव्यात पडली. त्यामुळे कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. क्रेनच्या सहाय्याने ही कार कालव्यातून बाहेर काढण्यात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दौंड उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले होते. दोन्ही वाहने कुरकुंभ पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

दुचाकीस्वार जागीच ठार

दरम्यान, दुसरा अपघात पालघर जिल्ह्यात झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामामार्गावर तलासरी इभाडपाडा येथे दुचाकी आणि आर्टिका कार दरम्यान हा भीषण अपघात झाला. महामार्ग क्रॉसिंग करून गुजरात वाहिनीने गुजरातच्या दिशेने जात असताना भरधाव आर्टिका कारने दुचाकीस्वारांना दिली धडक. भीषण अपघात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. त्यापैकी एकजण गंभीर जखमी झाला. अपघाती मृत्यू झालेले दोघे आणि जखमी तिघे नाशिक जिल्ह्यातील हरसूल बारिमाळ येथील रहिवासी आहेत.

या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी दूर करण्यात आली असून संथ गतीने वाहतूक सुरू झाली आहे. अपघातानंतर पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हिंगोलीत चार ठार

हिंगोलीतही नांदेड-हिंगोली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार झाले आहेत. कळमनुरी तालुक्यातील माळेगाव शिवारात रस्त्याच्याकडेला असलेल्या ट्रकला हैद्राबादहून येणाऱ्या आयशरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात आयशर चालकासह तिघांचा म्हणजे ऐकून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आयशरमधील 100 ते 150 मेंढ्याही दगावल्या आहेत. ट्रकमध्ये फरश्या होत्या. त्यामुळे अपघातामुळे फरश्या अंगावर पडल्याने शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या अपघातात आयशरचा चक्काचूर झाला आहे. चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचं सांगितलं जातं. पोलिसांनीही तसा अंदाज वर्तवला आहे. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून पोलिसांनी वाहतुकीचा मार्ग मोकळा केला आहे.