अमित शाहांपाठोपाठ अजित डोभाल यांचा Gen-Z ला संदेश काय? म्हणाले, स्वातंत्र्याचा अर्थ…
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी Gen-Z ला उद्देशून महत्त्वाचा संदेश दिला आहे. स्वातंत्र्याचा अर्थ मनमानी किंवा स्वैराचार नसून, देशाप्रती जबाबदारी आणि राष्ट्रनिष्ठा हेच खरे स्वातंत्र्य आहे.

जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनानंतर देशातील Gen-Z प्रकाशात आले आहेत. तरुणांच्या आंदोलनाने देशात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या तरुणांचं कौतुकही होत आहे आणि त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही या Gen-Zला संदेश दिला आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाहीये, असा सल्लाच अजित डोभाल यांनी दिला आहे. पुणे येथील कार्यक्रमात डोभाल बोलत होते.
पुण्यात आज अजित डोभाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. यावेळी डोभाल यांनी पुण्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. हा उजाळा देत असतानाच त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख न करता तरुणांना संदेश दिला आहे.
आपलं सौभाग्य की…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सारखं मजबूत नेतृत्व आपल्याला मिळालं हे आपलं सौभाग्य आहे. भारत यावेळी अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही समस्यांचा सामना करत आहे. देश वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे विरोधी शक्ती देशाच्या प्रगतीमुळे त्रस्त आहेत. अशावेळी देशातील नागरिकांनी सर्वात आधी देशाच्या हिताबाबत विचार केला पाहिजे, असं अजित डोभाल यांनी म्हटलं आहे.
मनमानी करू नका
आजच्या तरुणांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला पाहिजे. काही लोकांना स्वातंत्र्याचा अर्थ मनमानी वाटतो. किंवा काहीही करणं वाटतं. असा विचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे, असं सांगतानाच जो मार्ग देशाच्या विरोधात जातो, त्या मार्गाने जाऊच नव्हे. भारताला शक्तीशाली बनवणं हेच आपलं ध्येय आणि कर्तव्य असलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.
राष्ट्रभाव जागला पाहिजे
आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे, लोकमान्य टिळकांची राष्ट्रनिर्माणाची काय संकल्पना होती आणि त्यासाठी त्यांनी काय केलं हे जाणून घेतलं पाहिजे. आज टिळक असते तर भारताला सशक्त आणि विकसित बनवणं हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे टिळक म्हटले असते, एवढं स्वतंत्र्य मिळवले आहे. राष्ट्रभाव जागला पाहिजे, असं ते म्हणाले.