Ajit Pawar : लवकर करू लवकर करू, हे सांगायचं बंद करावं; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

| Updated on: Aug 06, 2022 | 12:36 PM

एकनाथराव उद्धव ठाकरेंसोबत काम करताना शिस्तीने वागायचे, आता वेगळेच सुरू असल्याची टीका त्यांनी केली. 10 नंतरही त्यांचा माइक सुरू असतो. महत्त्वाच्या पदावर बसल्यावर तारतम्य पाळायचे असते, असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

Ajit Pawar : लवकर करू लवकर करू, हे सांगायचं बंद करावं; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
अजित पवार
Image Credit source: Twitter
Follow us on

पुणे : आम्ही आरोप करत नाही. वस्तुस्थिती आहे. शपथविधी होऊन 35 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत. तरी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होत नाही. मुखमंत्र्यांनी लवकर करू लवकर करू, हे सांगायचे बंद करावे, अशी नाराजी विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते. अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोमवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांना माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली. पुणेकरांनी पाच वर्षे भाजपाचा कारभार पाहिला आहे. मीही अडीच वर्षे पालकमंत्री होतो. मी आपले पुणे, आपला जिल्हा म्हणून काय केले हे पुणेकरांनी पाहिले आहे. उद्याची 50 वर्षे डोळ्यासमोर ठेऊन पुण्याचे नियोजन केले. मात्र आता तर महिना झाला तरी पालकमंत्री (Guardian Minister) नाही, मंत्रिमंडळ नाही, असे ते म्हणाले.

‘पूर्वी निर्णय महाराष्ट्रात होत होते, आता…’

मीडिया यांना विचारतो, कधी? हे म्हणतात लवकरच, लवकरच, लवकरच. आम्ही दोघे आहोत, आम्ही दोघे आहोत. मला त्या दोघांच्यावर टीका करायची नाही. या दोघांच्या हातात काही नाही. दिल्लीत सर्व ठरते. पूर्वी निर्णय महाराष्ट्रात होत होते, असा टोला त्यांनी लगावला. तर अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्याशिवाय अंकुश निर्माण होत नाही. मंत्री नसल्याने पुढचे निर्णय घेता येत नाहीत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो, असे ते म्हणाले.

‘उद्धव ठाकरेंसोबत असताना शिस्तीने वागायचे, आता’

कायद्याचे, नियमांचे उल्लंघन होऊ देऊ नका. मुख्यमंत्री मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये गेले, तिथे घोषणा सुरू होत्या. बाकीच्या लोकांना त्याचा त्रास होतो. असे म्हणत एकनाथराव उद्धव ठाकरेंसोबत काम करताना शिस्तीने वागायचे, आता वेगळेच सुरू असल्याची टीका त्यांनी केली. 10 नंतरही त्यांचा माइक सुरू असतो. महत्त्वाच्या पदावर बसल्यावर तारतम्य पाळायचे असते, असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला. तर मुख्य सचिवांनाच सगळे अधिकार देऊन टाकण्यावरूनही त्यांनी शिंदेंवर टीका केली.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांची टीका

‘मग सत्ता गेल्यावर अधिकारी त्यांना धडा शिकवतात’

मी गेली 32 वर्षे समाजकारण, राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. अनेक लोक मला सकाळपासून भेटतात. सगळ्यांचीच कामे माझ्याकडून होतात, असा माझा दावा नाही. पण आलेल्या लोकांचे म्हणणे, अडचणी समजावून घेतल्या पाहिजेत. आता जे चालले आहे, ते लोक पाहत आहेत. अधिकाऱ्यांशी चांगले वागले, की सत्ता नसतानाही अधिकारी चांगले वागतात. अनेक जण सत्ता असताना अधिकाऱ्यांशी चांगले वागत नाही, मग सत्ता गेल्यावर अधिकारी त्यांना धडा शिकवतात. सत्ता येत असते, जात असते. ताम्रपट घेऊन कोणी येत नाही. आता आहे या सरकारचे काय होईल माहिती नाही. मात्र निवडणुका नक्की कधी होतील, याबद्दल कार्यकर्त्यांनी तत्पर असले पाहिजे.