शाळेत आता दप्तरात एकच पुस्तक न्यायचं, विद्यार्थी-पालकांसाठी सर्वात मोठी बातमी

| Updated on: May 24, 2023 | 10:18 PM

महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बालभारतीने विद्यार्थ्यांसाठी चार भागांमध्ये पुस्तकांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना एकच पुस्तक घेऊन जावं लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या दप्तराचं ओझं 75 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

शाळेत आता दप्तरात एकच पुस्तक न्यायचं, विद्यार्थी-पालकांसाठी सर्वात मोठी बातमी
फाईल फोटो
Follow us on

पुणे : शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणारं दप्तराचं ओझं हे नेहमीच चर्चेला कारण ठरतं. चिमुकल्यांना झेपणारही नाही इतकं वह्या-पुस्तकांचं ओझं त्यांच्या पाठीवर असतं. त्यामुळे शाळांनी यावर मार्ग काढावा. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं हे ओझं कमी व्हावं, अशी मागणी सातत्याने पालकांकडून केली जात होती. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून हा विषय चर्चेत आहे. अखेर या मुद्द्यावर बालभारतीने नामी शक्कल लढवत मार्ग काढला आहे. बालभारतीने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या पाठीवरचा भार जवळपास 75 टक्क्यांनी कमी होणार आहे. ही गोष्ट विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय आनंदाची आहे.

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं पुस्तक सोपं होणार आहे. कारण बालभारतीने विद्यार्थ्यांसाठी नवीन संकल्पना आणली आहे. विद्यार्थ्यांना आता सगळ्या विषयांचे वेगवेगळे पुस्तकं घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण एकाच पुस्ताक सर्वत विषयांचे पाठ असणार आहेत. विशेष म्हणजे अभ्यास करताना विद्यार्थ्यांना महत्त्वाची नोंद करता यावी यासाठी पुस्तकातच वहिची पानं जोडण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी होणार आहे.

पुस्तकांचे एकूण 4 भाग

बालभारतीकडून पुस्तकांचे एकूण 4 भाग करण्यात आले आहेत. या भागांमध्ये वेगवेगळे विषय अंतर्भूत करण्यात आले आहेत. उदारणार्थ एकाच पुस्तकात सर्व विषयांचे पाठ असतील. पण ते चार भागांमध्ये असतील. प्रत्येक विषयाचे दोन किवा तीन पाठ पुस्तकात असतील. विशेष म्हणजे पुस्तकांना वहीचं पानदेखील असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुस्तकावरच लिहिता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

बालभारतीचे राज्य संचालक कृष्णाकुमार पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला या विषयी सविस्तर माहिती दिली. “शासनाने 8 मार्च 2023 ला एक निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार इयत्ता दुसरी पासून ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं पाठ्यपुस्तक एकत्रित स्वरुपात राहावं असं ठरविण्यात आलं. विशेष म्हणजे पुस्तकांनाच वह्याचं पान जोडण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असताना काही नोंदी करता याव्यात यासाठी वह्यांचे पानं जोडण्यात आले आहेत. प्रत्येक पाठ किंवा कवितेनंतर वह्यांची पानं जोडण्यात येणार आहेत”, अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णाकुमार पाटील यांनी दिली.

विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं 75 टक्क्यांनी कमी होणार

“विशेष म्हणजे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं 75 टक्क्यांनी कमी होणार आहे. पुस्तकाची विभागनी चार भागात करण्यात आली आहे. यातला पहिला भाग हा दोन ते अडीच महिने शिकवला जाईल. त्यानंतर दोन ते अडीच महिन्यात शिकवला जाईल. तिसरा भाग हा दुसऱ्या सत्रात दोन ते अडीच महिन्यात शिकवला जाईल. शेवटचा चौथा भागही दोन ते अडीच महिन्यात शिकवला जाईल”, असं पाटील यांनी सांगितलं.

“हे पुस्तक म्हणजे वहीला पर्याय आहे, असं म्हणता येणार नाही. फक्त विद्यार्थी अध्ययन करत असताना त्यावेळेला ज्या तात्कालीन नोंदी करायच्या असतात जेणेकरुन अध्ययन अधिक मजबूत होईल त्यासाठी याचा फायदा होईल. विद्यार्थी नोंदी करु शकतील”, असं कृष्णाकुमार पाटील म्हणाले.

“अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पाठ्यपुस्तकाच्या रचनेत कोणत्याच प्रकारचा बदल नाही. फक्त पाठ्य पुस्तकात वह्यांची पानं टाक्यात आली आहेत. तसेच सर्व विषय एकत्रित करुन चार भागात पुस्तकाची विभागणी करण्यात आली आहे”, असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.