कधी हरलो, कधी जिंकलो… पहिल्यांदाच मी…, गिरीश बापट यांच्या मनाला हुरहूर; अखेरच्या भाषणात काय म्हणाले?

| Updated on: Mar 29, 2023 | 1:23 PM

भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72व्या वर्षी बापट यांचं निधन झालं आहे. आजच त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

कधी हरलो, कधी जिंकलो... पहिल्यांदाच मी..., गिरीश बापट यांच्या मनाला हुरहूर; अखेरच्या भाषणात काय म्हणाले?
Girish Bapat
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : राजकारणातील अजातशत्रू, भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. आजच संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गिरीश बापट हे कसबा विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले होते. एकदाही ते पराभूत झाले नाहीत. प्रत्येक निवडणूक ते जिंकले. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात ते लोकसभेवर निवडून गेले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांना आजाराने घेरले होते. त्यांना घरात ऑक्सिजन लावावं लागत होतं. त्यांचं चालणं फिरणंही बंद झालं होतं. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र भेटायला आलेल्यांना ते सल्ला द्यायचे. त्यांच्याशी चर्चा करायचे आणि त्यांच्या समस्या मार्गीही लावायचे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्यावेळीही ते आजारी होते. मात्र, निवडणुकीत भाजपची जिंकण्याची काही शक्यता उरली नसल्याने भाजपने त्यांना निवडणूक प्रचारात उतरवले होते.

हे सुद्धा वाचा

व्हिलचेअरवरून आले…

कसबा पोटनिवडणुकीच्यावेळी गिरीश बापट प्रचाराला आले होते. उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी ते आले होते. बापट व्हिलचेअरवरून आले होते. त्यांच्या दोन्ही नाकात ऑक्सिजनच्या नळकांड्या होत्या. त्यांची प्रकृती प्रचंड खालावलेली होती. त्यांना या अवस्थेत पाहून मतदारही रडले होते. पार्टी फर्स्ट म्हणत बापट या प्रचारात सहभागी झाले. त्यांनी दहा मिनिटे मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देतानाच कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्नही केला. आपणच जिंकणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला होता.

काय म्हणाले होते बापट?

“सर्वांना नमस्कार… 1968 सालानंतर ही पहिली निवडणूक आहे. त्यात मी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सक्रिय नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला. कधी हरलो, कधी जिंकलो. पण पक्षाची संघटना मजबूत राहिली. ही निवडणूक चुरशीची वगैरे काही नाही. त्यांनी (आधीच्या वक्त्याकडे बोट दाखवत) सांगितले ते बरोबर आहे. ही निवडणूक आपण जिंकणार. चांगल्या मताने जिंकणार. कार्यकर्त्यांना दिलेले जबाबदारी पूर्ण करा. अधिकवेळ द्या. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे. आणि मी गेली अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धन्यता मानलीय. आपला उमेदवार नक्की निवडून येणार. हेमंतचं काम चांगलं आहे. महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक चांगली कामं केली. थोडं नागरिकांपर्यंत घुसण्याची गरज आहे. थोडी जास्त ताकद लावा. विजय आपला नक्की आहे. काळजी करू नका. निवडून आल्यावर पेढे द्यायला मीच तुमच्याकडे येईल.”