पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघातांचा प्रश्न गडकरींच्या दरबारी, मोहोळ थेट दिल्लीत भेटीला

| Updated on: Oct 26, 2021 | 8:37 AM

पुण्यातील नवले ब्रीजजवळ होणाऱ्या अपघातांचा विषय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ थेट केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरींपर्यंत नेणार आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी महापौरांनी नितीन गडकरींची वेळ मागितली आहे. दिल्लीत जाऊन महापौर मुरलीधर मोहोळ नितीन गडकरीचीं भेट घेणार आहेत.

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघातांचा प्रश्न गडकरींच्या दरबारी, मोहोळ थेट दिल्लीत भेटीला
nitin-Gadkari-And-murlidhar mohol
Follow us on

पुणे : पुण्यातील नवले ब्रीजजवळ होणाऱ्या अपघातांचा विषय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ थेट केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरींपर्यंत नेणार आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी महापौरांनी नितीन गडकरींची वेळ मागितली आहे. दिल्लीत जाऊन महापौर मुरलीधर मोहोळ नितीन गडकरीचीं भेट घेणार आहेत.

नवले पूल आणि महामार्गाचा एकत्रित अहवाल तयार केला जाणार आहे. महामार्गाचं काम एन एच आयने रखडवल्यामूळे अपघात होतायेत असा आरोप आहे. अपघातांच प्रमाण वाढल्यानं रस्त्यावरुन प्रवास करणं देखील धोकादायक बनलं आहे. महापालिका आणि नितीन गडकरी एकत्रित बसून याबाबत निर्णय घेणार, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी सभागृहात दिली.

नवले पूल बनला ‘डेथ झोन’

मुंबई बंगळुरु बाह्य वळण महामार्गावरील पुण्यात वाहतुकीसाठी धोकदायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल या महामार्ग भोवती अफाट नागरिकीकरण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हा मार्ग आता जीवघेणा ठरत आहे. 2014 पासून या ठिकाणी झालेल्या अपघातात 56 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

शुक्रवारी (22 ऑक्टोबर) नऱ्हे गावच्या ठिकाणी सेल्फी पॉईंटजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास थिनर वाहतूक करणाऱ्या टँकरने समोर चाललेल्या सतरा सीटर टेम्पो ट्राव्हलरला कट मारण्याच्या नादात धडक दिली. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच 12 जण जखमी झाले. यानंतर पुन्हा एकदा या रस्ता चर्चेत आलाय.

याठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागिरक करताहेत. प्रशासन फक्त काम करत असल्याचे भासवत आहे. तसेच, स्थानिक लोक प्रतिनिधी फक्त पाहाणी करुन आदेश देण्यात धन्यता मानताना दिसत आहे. परंतु त्यावरील ठोस उपयोजना झाली आहे की नाही याकडे मात्र सर्रासपणे डोळे झाक करत असल्याचं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

वर्षांत झालेले अपघात (2020-2021)

♦ नेहमी अपघात होणारे अंतर चार किलोमीटर (कात्रज नवीन बोगदा ते वडगाव पूल )
♦ छोटे-मोठे 42 अपघात
♦ 22 मृत्यू
♦ 7 ब्लॅक स्पॉट
♦ 40 हून अधिक जखमी
♦ 60 हुन अधिक वाहनांचे नुकसान
♦ मोठे अपघात 16, मृत्यू 18
♦ 2014 पासून एकूण मृत्यू 56

कात्रज नवीन बोगद्यपासून नवले पुलापर्यंत अतिशय तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग वाढतो. वेग वाढल्यानंतर अवजड वाहनांवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात घडत आहेत. त्याचप्रमाणे नवले पुलाचा उतार आणि वडगाव पुलावर जाताना असणारा चढ तसेच विश्वास हॉटेल समोर असणारे पंचर अतिशय धोकादायक ठरत आहेत. अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे दिसून आले आहेत. तसेच, चालकांनी देखील वाहने जबाबदारीने चालवावीत, महामार्गाच्या नियमांचे पालन करावे, असं महामार्ग प्रशासन आणि पोलिसांच म्हणणं आहे.

याठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघाताला बेफाम वेगात वाहनं चालवणाऱ्या चालकांसह महामार्ग प्रशासन ही तितकेच जबाबदार आहे. अपघाताच खापर वाहनचालकांच्या चुकांवर फोडण्याआधी प्रशासनाने आपल्या चुका दुरुस्त करण्याची अधिक आवश्यकता आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातला अपघात स्पॉट, नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल मार्ग बनला ‘डेथ झोन’, आतापर्यंत 56 जणांचा बळी

VIDEO | सोलापूर-पुणे हायवर टेम्पोचा अपघात, कोंबड्या पळवण्यासाठी स्थानिकांची झुंबड