इंदापुरातील कार्यकर्त्यांची नाराजी दूर होणार? देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय आश्वासन दिलं?

| Updated on: Apr 05, 2024 | 7:11 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदापुरातील कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. "आपल्याला मोठ्या ध्येयासाठी काम करायचं आहे. झालं ते विसरून महायुतीसाठी काम करायचं आहे. मोदींसोबत बारामतीचा खासदार पाहायचा आहे. तुमचं म्हणणं समजून घेतलं आहे, आणि कृतीतून करून दाखवणार", असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

इंदापुरातील कार्यकर्त्यांची नाराजी दूर होणार? देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय आश्वासन दिलं?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Follow us on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज इंदापुरातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. “2019 मध्ये छोटासा अपघात झाला. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. मनाला बोचणारा पराभव होता. पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही काही लोकं मतांच्या विरोधात गेलेत. निव्वळ खुर्चीसाठी आमचे 25 वर्षांचे मित्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गेले. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठरवलं. महाविकास आघाडीत आपल्याला राहायचं नाही म्हणून त्यांनी निर्णय घेतला. त्यावेळी राष्ट्रवादी देखील खदखद सुरू होती. म्हणून अजित पवारांनी विकासासाठी मोदींसोबत गेलं पाहिजे असा विचार केला. जे लोकं आपल्यासोबत यायला तयार होते. त्यांना सोबत घेतलं पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“काही ठिकाणी आपला संघर्ष हा राष्ट्रवादीसोबत होता. काही ठिकाणी टोकाचा संघर्ष होता. मोदी साहेबांसाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. मी निर्णय घेतल्यानंतर तीन-चार लोकांशी बोललो. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील होते. नेत्यांना युती करणं सोपं असतं. मात्र कार्यकर्त्यांना युती करणं अवघड असतं. मी तुम्हाला आज विश्वास देण्यासाठी आलो आहे. हर्षवर्धन पाटलांसह मी इंदापूर तालुक्याचे पालककत्व स्वीकारण्यासाठी आलो आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी’

“आज एका मोठ्या लढाईकडे चाललो आहोत. काही लोकांना असं वाटतंय, बारामतीची लढाई ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आहे. काही लोकांना असं वाटतंय ही लढाई सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आहे. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. मोदींच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्या सुप्रिया सुळे होत्या. कलम 370 ला विरोध सुप्रिया सुळे यांचा होता”, असा आरोप फडणीसांनी केला.

फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आश्वासन

“चीन आणि पाकिस्तानला वाकडी नजर करून पाहता येणार नाही. हा मोदींचा सन्मान नाही. हा भारताचा सन्मान आहे. आपल्याला मोठ्या ध्येयासाठी काम करायचं आहे. झालं ते विसरून महायुतीसाठी काम करायचं आहे. मोदींसोबत बारामतीचा खासदार पाहायचा आहे. तुमचं म्हणणं समजून घेतलं आहे, आणि कृतीतून करून दाखवणार हा विश्वास देण्यासाठी आज आलो आहे”, असं आश्वासन फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिलं.